रविवार, २४ मार्च, २०२४

बचेंगे तो और भी लडेंगे !

 बचेंगे तो और भी लडेंगे !


 

       वरील शीर्षकाला अनुशंगून इतिहासातील तीन घटना इथं सांगाव्याशा वाटतात.

🚩 घटना पहिली...


दिनांक - १० जानेवारी १७६०
स्थळ - बुराडी घाट
घटना नायक - दत्ताजी शिंदे


       लेखाला जे शीर्षक दिलंय त्या शीर्षकाचं मूळ या पहिल्या घटनेत आहे.

       तो काळ होता १७५८ चा. पानिपताच्या युद्धाचे वेध लागायला सुरुवात झाली होती. लाहोर सोडवून दत्ताजी आणि जनकोजी शिंदे हे काका-पुतणे नजीबाचे पारिपत्य करण्यासाठी दिल्लीला यमुनाकाठी रामघाट इथं आले. दरम्यान मल्हारराव होळकरांनी दत्ताजींना नजीबाचे पारिपत्य करण्यापासून परावृत्त केलं. नजीबानं मराठ्यांच्या सैन्याला यमुना नदीचं पात्र ओलांडण्यासाठी 'नावांचा पुल बांधण्यात मदत करतो' या वचनावर जवळजवळ सहा महिने झुलवत ठेवलं. या सहा महिन्यात नजीबानं आतून सर्व मुस्लिम राजांशी संधान बांधून दताजींच्या विरोधात सर्व बाजूंनी चांगलीच मोर्चेबांधणी केली.

       १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात नजीबाच्या सांगण्यावरून अहमदशहा अब्दाली दत्ताजींच्या पिछाडीने दत्ताजींवर चाल करून आला. समोरचा यमुनेचा पूल नजीबाच्या ताब्यात तर मागे अब्दाली. आता दत्ताजी आणि जनकोजी दोघे चांगलेच कात्रीत सापडले पण अशा परिस्थितीतही दत्ताजींनी थेट नजीबावर चाल करून त्याला मागं रेटलं. परिस्थिती ओळखून नजीबानं दत्ताजींशी तात्पूरता तह केला.

       डिसेंबर महिन्यात अब्दाली कुरूक्षेत्राला येईपर्यंत दिल्लीपती शुजानेही एक कोटी खंडणीची थाप मारून दत्ताजींना कुरूक्षेत्राला अडकवून ठेवलं. कुरूक्षेत्रावर दताजींच्या समोरच्या बाजूला रोहिले तर मागे अब्दाली. दत्ताजी कुरुक्षेत्रावर चांगलेच कात्रीत सापडले पण माघार घेतील ते दत्ताजी कसले? आपल्या पुतण्याला म्हणजे जनकोजींना त्यांनी कबिल्यासह दिल्लीला पाठवलं आणि २४ डिसेंबर १७५९ रोजी कुंजपुरा इथं अहमदशहा अब्दालीशी लढाई छेडली आणि त्याच दिवशी अब्दालीचा सपाटून पराभव केला. हार पत्करल्यावर अब्दाली यमुनापार उतरला आणि नजीब, शुजा आणि मोहम्मद बंगश यांन जाऊन मिळाला. आता सर्व मुसलमान एक झाले आणि दत्ताजी एकटे पडले. त्यामुळं दत्ताजी मराठ्यांचं सैन्य घेऊन दिल्लीला आपल्या पुतण्याला म्हणजे जनकोजींना जाऊन मिळाले. दत्ताजी आणि जनकोजी यांना आता समोरासमोरचे युद्ध टाळता येणार नाही याची पुरेपुर खात्री पटली त्यादृष्टीने त्यांनी युद्धाच्या डावपेचांची आखणी करायला सुरूवात केली.

       १० जानेवारी १७६० ची मकरसंक्रांत उजाडली. दत्ताजींचं सैन्य यमुना पार करण्यासाठी उतार शोधू लागलं पण तो काही मिळेना. हे चालू असतानाच शत्रूसैन्य नदी उतरून मराठ्यांवर थेट हल्ले करू लागलं. दत्ताजींनी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. नजीबाच्या आणि गिलच्यांच्या ताज्या दमाच्या फौजेकडं बंदूका होत्या ज्या मराठ्यांकडं नव्हत्या साहजिकच एक एक मराठा बंदूकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा खच रणांगणावर जिकडं तिकडं दिसू लागला. गनिमांनी एकाचवेळी तिनही बाजूंनी मराठ्यांवर हला केला होता. बऱ्याच वेळपासून निकराने गिलच्यांना पाणी पाजणाऱ्या जनकोजींच्या दंडाला गोळी लागली आणि ते खाली कोसळले. लगोलग ही बातमी दत्ताजींना पोहोचवण्यात आली. हे ऐकून रागाने लाल झालेल्या दत्ताजींनी रणांगणावर मृत्यूचे तांडव माजवलं. तेवढ्यात त्यांना हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब दिसला. वाटेत येणाऱ्या अफगाणांचे मुडदे पाडत दताजी नजीबावर चालून गेले. इतक्यात जंबूरक्याचा एक गोळा दताजींच्या बरगडीला लागला आणि ते जागीच कोसळले. दताजी कोसळलेत म्हटल्यावर नजीब आणि कुतूबशहा दत्ताजींवर झेपावले. तलवार उचलण्यासाठी धडपडत असलेल्या दत्ताजींचे डोके हातात धरून कुतूबशहा म्हणाला...

'क्यू पटेल, और लडोगे?'

हे ऐकून बाणेदार दत्ताजींनी त्याच तडफेनी त्याला उत्तर दिलं.

'क्यो नहीं, बचेंगे तो और भी लडेंगे !'

हे ऐकून कुतूबशहा दत्ताजींच्या शरीरावर बसला आणि त्यांच्या छातीची चाळण करू लागला. नजीबाने हातातला जमदाडा दताजींच्या मानेवर घातला आणि त्यांचं शीर धडावेगळं केलं.

क्रमशः


🚩 घटना दुसरी...


दिनांक - ११ जून १६६५
स्थळ - किल्ले पुरंदर
घटना नायक - छत्रपती शिवाजी महाराज


       रायरेश्वराच्या प्रतिज्ञेपासून म्हणजे २७ एप्रिल १६४५ पासून शिवाजी महाराजांचे स्वराज्याच्या सीमा विस्तारण्याचे प्रयत्न दररोज वाढतच चालले होते. मोगल आणि आदिलशहा या दोघांनी मिळून अहमदनगरची निजामशाही बुडवल्यावर तिच्या प्रदेशाची आपापसात लगेचच वाटणी पण करून घेतली. पैकी आदिलशाहीकडे मावळातील व कोकणातील जो नवीन प्रांत आला त्यामध्ये आणि मोगलांकडे आलेल्या कल्याण, भिवंडी भागात महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न चालवले होते. इ. स. १६३७ सालात निजामशाही बुडवल्यापासून ते इ. स. १६४५ सालात स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू करेपर्यंतच्या मधल्या ८ - १० वर्षांच्या काळात आदिलशाहीकडे आलेल्या पुणे, सुपे, मावळ आणि लगतच्या कोकण भागावर विजापुरकरांचा म्हणावा तसा अंमल बसला नव्हता. तिथले देशमुख, मुलकी अधिकारी म्हणावे तसे आदिलशाहीच्या अंकीत झाले नव्हते. एकूणच सगळीकडे स्वैराचार माजला होता. त्यांच्या बेबंदशाहीला शिवाजी महाराज परस्पर पायबंद घालू लागल्यामुळे आदिलशाहीच्या ते पथ्यावरच पडले होते. त्या सर्वांचा नाश केल्यावर शेवटी एकट्या राहिलेल्या शिवाजी महाराजांची 'योग्य' व्यवस्था लावता येईल असा आदिलशाहीचा डाव होता. त्यामुळे १६५६ पर्यंत फत्तेखानाची स्वारी सोडता विजापुरकरांकडून फारशा स्वाऱ्या महाराजांवर झाल्या नाहीत पण त्यानंतर वाई, कराड भागात सीमा विस्तारण्यासाठी महाराजांच्या हालचाली सुरू झाल्या. आता मात्र स्थिरस्थावर असलेल्या म्लेंछ सत्तांना साधारणपणे १६५६ नंतर शिवाजी महाराज म्हणजे एक डोकेदुखी होऊ लागली होती. या त्रासाचा सर्वात मोठा फटका विजापुरच्या आदिलशाहीला बसत होता.

       २५ जुलै १६४८ मध्ये आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाकानाने जिंजीजवळ शहाजीराजांना अटक केली. त्यांच्या सुटकेसाठी आदिलशहाने दोन किल्ल्यांची मागणी केली. किल्ले बंगळूर आणि किल्ले कोंढाणा.  शिवाजी राजांना सिंहगड आदिलशहाला नाईलाजानंच द्यावा लागला होता. खरंतर हा किल्ला महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते. त्यावेळी सोनोपंतांनी महाराजांना 'दुर्गनिती' सांगितली जी कवींद्र परमानंदांनी शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात दिलेली आहे. ते म्हणतात...

न दुर्गं दुर्गमित्येव दुर्गमं मन्यते जनः l
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तस्य दुर्गमः ll ६१ ll

अर्थ - दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानीत नाहींत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.

प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गमः l
अदुर्गमत्वादुभयोर्विद्वषन्नव दुर्गमः ll ६२ ll 

अर्थ - प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गांमुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो.

संति ते यानि दुर्गाणि तानि सर्वाणि सर्वथः l
यथा सुदुर्गमाणि स्युस्तथा सद्यो विधीयताम् ll ६३ ll

अर्थ - तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा.

       या दुर्गनितीच्या श्लोकांचा सारांश शिवभारताच्या प्रस्तावनेत दत्तात्रेय विष्णू आपटेंनी दिला आहे. त्या सारांशाच्या मूळ तर्जुम्याचा अर्थ असा...

       'राजकारणात बलवानाशी मारामारी करण्याचा प्रसंग आणणे शहाणपणाचे गणले जात नाही. शहाजीराजांनी बलवानाशी वैर केले आणि ते गैरसावध राहिले यामुळे त्यांच्यावर कायद्याचा प्रसंग आला. सध्या आदिलशहा व दिल्लीपती हे दोघेही तुमच्यावर (शिवाजी राजांवर) रागावले आहेत आणि त्या दोघांनाही एकजूट होऊन चाल केली तरी तुमचा निभाव लागेल असे दुर्गम स्थान हस्तगत करण्याचा प्रथम प्रयत्न करा तोपर्यंत आधी शत्रूच्या पक्षात फाटा फूट कशी पाडता येईल ते पहा. भेदनीती हीच राजकारणात फार उपयोगी असते. पित्याची सुटका होण्यासाठी एखादा गड द्यावा लागला तरी हा सौदा महाग पडला असे वाटण्याचे कारण नाही. किल्ल्याचा स्वामी अजिंक्य असणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.'

       नंतरच्या काळात म्हणजे इ.स. १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना नाईलाजानंच मोगलांबरोबर पुरंदराचा तह करावा लागला. या तहात त्यांना तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा प्रदेश मोगलांना द्यावा लागला. या तेवीस किल्ल्यात मराठ्यांच्या राज्यातला सामरिकदृष्टीने महत्वाचा आणि १६४८ साली शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिलेला सिंहगडदेखील होता. एक सिंहगड जो महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते तिथं आज २३ किल्ले मोगलांना द्यायला महाराज तयार झाले होते. पुरंदरचा तह हा खरं सांगायचं तर स्वराज्यस्थापनेच्या प्रवासातील सगळ्यात वेदनादायी प्रसंग म्हणावा लागेल पण या प्रसंगाला जितका वेदनादायी म्हणता येईल तितकाच त्याला खूप काही शिकवून जाणारा सुद्धा म्हणावं लागेल.

       महाबलवान शत्रुविरुद्ध लढून मरण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन वेळ येताच पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीचा निर्धार उरात बाळगायला हवा. म्हणजेच काय तर...

बचेंगे तो और भी लडेंगे !

क्रमशः


🚩 घटना तिसरी...


दिनांक - फेब्रुवारी १९११
स्थळ - सेल्युलर जेल, अंदमान.
घटना नायक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.


       स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या देशसेवेच्या, समाजप्रबोधनाच्या वगैरे केलेल्या कार्याबद्दल इथं सांगत नाही कारण त्याबद्दलची सर्व माहीती सोशल मिडीयावर, अनेक लेखकांनी केलेल्या चरित्र लेखनात मिळेल आणि मुख्य म्हणजे या लेखाचा तो विषय नाही. इथं फक्त मूळ विषयाशी सुसंगत मुद्दा मांडत आहे.

       १९०६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्‍लंडला गेले आणि तिथूनच अभिनव भारताच्या आंतरराष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ झाला. इंग्‍लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जिथं राहत होते ते ‘भारत भवन’ हे 'अभिनव भारत' या चळवळीचं मुख्य केंद्र बनलं. भारतातून इंग्‍लंडमध्ये येणारे तरुण विद्यार्थी भारत भवनाकडे आकर्षित होऊन सशस्त्र क्रांतीसाठी आवश्यक असलेले शस्त्रनिर्मितीचे शास्त्रीय ज्ञान निरनिराळ्या देशांतील क्रांतिकारकांशी संपर्क साधून मिळवू लगले. वेगवेगळ्या मार्गांनी भारतात पिस्तुलेही पाठवण्यात येऊ लागली. स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्‍लंडमध्ये असताना १९०९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचे थोरले बंधू बाबाराव यांच्यावर त्यांच्या देशभक्तीपर केलेल्या पद्यांबद्दल ब्रिटीशविरोधी बंड करण्याचा आरोप ठेवून त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली. ब्रिटीशांनी बाबारावांना केलेल्या या शिक्षेमुळं तरुण पिढीत एक सूडाची भावना निर्माण झाली. मदनलाल धिंग्रा यांनी खुद्द इंग्‍लंडमध्ये केलेला कर्झन वायली याचा तर कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे यांनी नाशिक इथं केलेला वध हे या सूडाच्या भावनेमुळेच झाले. नाशिकच्या वध हा पूर्वनियोजित कट असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत असं परस्पर ठरवून ब्रिटीश सरकारने त्यांना इंग्‍लंडमध्ये अटक केली. खरंतर जॅक्सनच्या वधामुळं सरकार बिथरून गेलं होतं. भारतात आणल्यावर सेशल ट्रिब्यूनलपुढं खटल्याचं काम सुरू झालं. एकूण सत्तर दिवस या खटल्याचं काम चाललं. शेवटी २४-१२-१९१० या दिवशी निकाल सांगण्यात आला. त्यात सावरकरांना जन्मठेपेची म्हणजे काळ्यापाण्याची पहिली शिक्षा झाली.


       पहिल्या जन्मठेपेची जी शिक्षा झाली तिने ब्रिटीश सरकारचं समाधान झालं नाही म्हणून जॅक्सनच्या खुनास मदत केल्याचा आरोप करत ब्रिटीश सरकारनं सावरकरांवर दुसरं आरोपपत्र दाखल केलं. 'जॅक्सनच्या खुनाला मदत करण्याच्या बाबतीत माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने काहीही संबंध नाही.' अशी दुसऱ्या खटल्यात सावरकरांनी आपली बाजू मांडली खरी पण अर्थातच न्यायमूर्तीनी त्याला मान्यता दिली नाही. विलायतेस जाण्यापूर्वी आरोपीचे चरित्र, इंग्लंडमधील त्याची कृत्ये, इत्यादीवरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आरोपीने दोन पिस्तुलं सरकारी अधिकाऱ्यांचा खून करण्यासाठीच पाठवली होती आणि यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ३० जानेवारी १९११ रोजी दुसरी जन्मठेप म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पहिली २५ वर्षांची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना सलग दुसरी २५ वर्षांची शिक्षा भोगायची होती. ब्रिटीश सरकारच्या कोर्टानं त्यांना एकूण दोन जन्मठेपांची म्हणजे पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. काय होती ही शिक्षा आणि त्यांच्यावर कोणती कलमे लावण्यात आली होती? तर पुढील कलमं त्यांच्यावर लावण्यात आली होती.

१) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १२१.

"भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे किंवा युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध पुकारणे."

शिक्षा - मृत्यू, किंवा जन्मठेप आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र

२) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १२१(अ).

"राज्याविरुद्ध काही गुन्हे करण्याचा कट रचणे."

शिक्षा - जन्मठेप, किंवा १० वर्षे कारावास आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र

३) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १०९.

"कोणत्याही गुन्ह्यास उत्तेजन देणे, जर प्रवृत्त केलेले कृत्य परिणामी केले गेले असेल आणि जेथे त्याच्या शिक्षेसाठी कोणतीही स्पष्ट तरतूद केली गेली नसेल."

शिक्षा - उत्तेजित केलेल्या गुन्ह्याप्रमाणेच.

गुन्हा - गुन्ह्यानुसार गुन्हा दखलपात्र किंवा अदखलपात्र आहे. गुन्ह्यानुसार प्रवृत्त केलेले जामीनपात्र किंवा अजामीनपात्र आहे.

४) भारतीय दंड संहिता १८६०, कलम ३०२.

"खून."

शिक्षा - मृत्यू, किंवा आजीवन कारावास आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र.


       अंदमानात असताना सावरकरांना जो बिल्ला दिला होता त्या बिल्ल्याचं हे छायाचित्र आहे. यात १२१, १२१ A, १०९ व ३०२ हीे राजद्रोहाची कलमे, सावरकरांच्या कारावासाची एकूण वर्षे (50 YEARS), शिक्षेची पहिली तारीख (24.12.1910) सावरकरांना मिळालेलं 'डेंजरस' किंवा 'डी' तिकीट (D) व शिक्षेची शेवटची तारीख (23.12.1960) या माहितीचा उल्लेख आहे. हे छायाचित्र २३/१२/१९६० रोजी लंडनच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालं. हा अंक लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीने जपून ठेवलेला आहे.

       भारताच्या इतिहासात हिंसक वा अहिंसक यापैकी कोणत्याही मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय अन्य कुणालाच जन्मठेपेची ५० वर्षं शिक्षा मिळालेली नाही. ब्रिटीशांनी त्यांना दिलेल्या या काळ्यापाण्याच्या शिक्षेतूनच खरंतर त्यांचा ब्रिटीश सत्तेला असलेला धोका आणि त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यसमरातील महत्व अधोरेखीत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील कोर्टाने १९१० आणि १९११ साली फर्मावलेली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा कोणताही विरोध न करता स्विकारली. आज या घटनेला तब्बल ११३ वर्षे होऊन गेली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात सहजी दिसून येणारे अटकपुर्व जामीन, रात्री-अपरात्री सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यासारखे किंवा कोर्टाचा अवमान होईल असे कोणतेच प्रकार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देखील केले नाहीत.

       तत्कालिन राजकीय परिस्थितीचा विचार केला तर सावरकरांना तुरूंगात राहून मरण येण्यापेक्षा त्यांचे बाहेर राहणं गरजेचं दिसतं. बरं सावरकरांनी माफीनामा लिहिलाच असेल तर तो त्यांचा सांविधानिक हक्क होता जो तत्कालिन अनेक राजकिय नेत्यांनीही अवलंबला होता. अर्थात हा सगळा एका राजकारणाचाच भाग होता हे नक्की कारण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी अशी पत्रे औरंगजेबाला पाठवली होती. अखेर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या अर्जांना यश आलं आणि १९२१ साली ब्रिटीशांनी सावरकरांची अंदमानमधून सुटका केली. त्यानंतर पुढं ते तीन वर्षे स्थानबद्धतेत होते. अखेर ०६ जुन १९२४ रोजी ब्रिटीश सरकारनं त्यांना मुक्त केलं. ०६ जुन १९२४ पासून २६ फेब्रुवारीला त्यांनी देह ठेवेपर्यंत समाज सुधारणेचं प्रचंड कार्य केलं. थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील त्यांचाच कित्ता गिरवलेला दिसून येतो...

       'महाबलवान शत्रुविरुद्ध लढताना कैदेत मरण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन वेळ येताच पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीचा निर्धार उरात बाळगायला हवा.' म्हणजेच काय तर...

🚩 बचेंगे तो और भी लडेंगे !

समाप्त

🚩 संदर्भ -

१) दत्ताजी शिंदे - विकिपीडिया
२) शिवभारत - कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर
३) मराठी विश्वकोश
४) माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

ब्रिटिश तोफ / British Cannon

ब्रिटिश तोफ / British Cannon

       ब्रिटीश सुरूवातीला भारतात व्यापारासाठी आले अणि नंतर आपल्यावर दिडशे वर्ष राज्य केलं हे सर्वश्रृतच आहे. मोगल, आदिलशहा, कुतूबशहा आणि मराठे असे भारतातील सर्वच राज्यकर्ते ब्रिटीशांकडून किंवा कमी अधिक प्रमाणात पोर्तूगिजांकडून युद्धसाहित्य विकत घेत असत. अर्थात त्याला कारणही तसंच होतं, ते म्हणजे त्यांचं पुढारलेलं तंत्रज्ञान. स्वदेशी बनावटीच्या युद्धसाहित्यापेक्षा परदेशी युद्धसाहित्य हे अधिक किफायतशीर, खात्रीशीर आणि टिकाऊ असे. इतक्या वर्षांनंतर आजही आपण काही प्रमाणात तेच करतो आहोत. असं करण्याचं मुख्य कारण म्हणजे परदेशी धातूशास्त्र, तंत्रज्ञान आजही स्वदेशी तंत्रज्ञानापेक्षा कित्येक पटींनी पुढारलेलं आहे. तसं पहायला गेलं तर सर्वच क्षेत्रात युरोपीय देश हे आपल्या कित्येक वर्ष पुढे आहेत. या बाबतीत एका वाक्यात उदाहरणंच द्यायची झाली तर ती अशी देता येतील.. "शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याची बातमी इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रात छापून आली होती." किंवा "शिवाजी महाराजांनी १६७२ साली केलेल्या दुसऱ्या सुरत लुटीची बातमी लंडन गॅझेट या वृत्तपत्रात छापून आली होती" किंवा "०२ फेब्रूवारी १७६३ ला स्कॉटलंडमधील 'द कॅलेडॉनियन मर्क्यूरी' या वृत्तपत्रात पानिपताच्या युद्धाचा वृत्तांत छापून आला होता" आणि 'द बंगाल गॅझेट' हे भारताचे पहिले वृत्तपत्र १७८० साली कलकत्ता येथे सुरू झाले. असो, थोडं विषयांतर होतंय.


       तर मूळ मुद्दा हा की आपण त्या काळात ब्रिटीशांकडून युद्धसाहित्य विकत घेत असल्यामुळं आजही आपल्याला वस्तू संग्रहालयात बरंचसं विदेशी युद्धसाहित्य पहायला मिळतं. फक्त युद्धसाहित्याचा एक प्रकार जास्त करुन किल्ल्यावरच पहायला मिळतो तो म्हणजे तोफ. त्या तोफांविषयी आणि खास करून फक्त ब्रिटीश तोफांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

       गड किल्ल्यांवरील तोफा आपल्या सर्वांना परिचित आहेतच. ‘तोफ’ हा अपभ्रंश झालेला स्त्रीलिंगी फार्सी शब्द मूळ ‘तोप’ असा आहे. तोप हा शब्द तुर्की भाषेतुन आलेला आहे. जगभरात तयार केलेल्या तोफांना वेगवेगळी नावे दिली गेली. आपल्या सर्वांना माहिती असलेल्या कलाल बांगडी, लांडा कासम, मुलूख मैदान, मेंढा, कडक बिजली वगैरे तोफांची नावं प्रसिद्ध आहेतच. कोकणातल्या बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला स्वदेशी तोफांसोबत ब्रिटीश तोफा आज देखील दिसून येतात.

       नुकतीच आम्ही कोकणातल्या दुर्गांची भटकंती केली. आमची ही भटकंती विजयगडापासून मंडणगडापर्यंत होती. या भटकंतीत आम्ही बाणकोटचा किल्लादेखील पहिला. बाणकोट किल्ल्याच्या दर्शनी बुरुजावर एक ब्रिटीश तोफ आहे आणि त्यावर काही चित्र तर काही आकडे लिहिलेले दिसून येतात. सोबत्यांना त्याचा अर्थ समजावून दिला पण तेव्हा लक्षात आलं की यावर एखादा लेख लिहिला तर सर्वांनाच याविषयी माहिती होईल म्हणूनच हा लेखनप्रपंच. तर काय आहे या ब्रिटीश तोफांवरील चित्रांचा अर्थ आणि ते आकडे नेमकं काय सांगत होते? पाहूया...

       ब्रिटीश तोफांवरील हे चित्र दोन भागात आहे. वरच्या बाजुला ब्रिटीश रॉयल क्राऊन आहे तर त्याच्याखाली राजाचे नाव संक्षिप्त रुपात कोरलेलं आहे. ही तोफ ब्रॉन्झची असल्यामुळं यावर चांगल्या प्रकारचं कोरीव काम केलेलं आढळून येतं.

       रॉयल क्राऊनच्या खालच्या बाजूला इंग्रजी GR अक्षरे कोरलेली दिसत आहेत तर G अक्षरात 2 गुंफलेला दिसून येत आहे. G म्हणजे राजाचं नाव जॉर्ज, R म्हणजे Rex याचा अर्थ लॅटीन भाषेत राजा असा होतो तर 2 आकडा एकाच नावाचा हा दुसरा राजा आहे असा होतो. थोडक्यात G R 2 म्हणजे ही तोफ 'King George II' याच्या कार्यकाळात बनवली गेली आहे. King George II या इंग्लडमधल्या राजाचा कार्यकाळ 1727–1760 असा 33 वर्षांचा होता. या 33 वर्षादरम्यान ही तोफ बनवली गेली आहे.

        ही तोफ Cast Iron या धातूची बनवली गेल्यामुळं या तोफेवर म्हणावी तशी कलाकुसर नाही किंवा काळानूरूप ती झिजून गेली आहे. रॉयल क्राऊनच्या खालच्या बाजूला इंग्रजी GR अक्षरे कोरलेली दिसत आहेत तर G अक्षरात 3 गुंफलेला दिसून येत आहे. याचा अर्थ ही तोफ King George III याच्या काळात तयार केली गेली आहे. King George III या इंग्लडमधल्या राजाचा कार्यकाळ 1760–1820 असा 60 वर्षांचा होता. या 60 वर्षादरम्यान ही तोफ बनवली गेली आहे.

       या चित्रात कोरलेल्या रॉयल क्राऊनखाली एकाखाली एक असे इंग्रजी P, 1797 आणि WG असं लिहिलेलं दिसून येत आहे. यातला P म्हणजे या तोफेचं Proofing केलेलं आहे. Proofing केलेलं आहे म्हणजे या तोफेत तोफगोळा घालून Testing केलं गेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक तोफ एकदा वापरून त्या कारखान्याचे Quality Control Department त्या तोफेचं Testing Certificate देत आहे असा होतो.

       1797 हा आकडा या तोफेचं Manufacturing Year दर्शवतं.

       WG ही अक्षरे ही तोफ ज्या कारखान्यात तयार केली गेली त्या कारखान्याच्या नावाचं संक्षिप्त रूप आहे. ही तोफ 'W Greener' Guns manufacturing Company मध्ये बनवली गेली आहे असा त्याचा अर्थ होतो.

       तोफेच्या या भागाला Trunnion म्हणजे त्रिकूट असं म्हटलं जातं. फोटोत 82699 हा आकडा दिसतोय जो या तोफेचा Serial Number आहे.

       CARRON हे तोफ बनवणाऱ्या कारखानदाराचं नाव आहे. CARRON हा एक तोफा तयार करणारा त्या काळातील नावाजलेला कारखाना होता. ज्याची स्थापना 1759 साली झाली.

       तोफेवर असलेलं 1814 हे त्या तोफेचं Manufacturing Year दर्शवतं. सारांश असा की ही तोफ 1814 साली CARRON या कारखान्याने बनवली असून त्याचा Serial Number 82699 असा आहे.

       काही तोफांच्या Trunnion म्हणजे त्रिकूटावर किंवा दर्शनी भागावर P च्या आधी एक आकडा कोरलेला असतो. तो आकडा त्या तोफेतून किती पौंड वजनाचा गोळा डागता येतो ते दर्शवतो. इथं 32 P दिसतंय म्हणजे या तोफेतून 32 पौंड वजनाचा गोळा डागून हीचे Proofing केलेलं आहे असं समजून येतं.


       सर्वसाधारणपणे उपयोगानूसार 3, 4, 6, 9, 12, 18, 24, 32, 42 अशा विविध पौंडी तोफा कारखान्यात तयार केल्या जात. त्याचं Point Blank Range आणि Utmost Range With Major Caution नूसार कोष्टक दिले आहे. किती पौंडी तोफेची मारक क्षमता किती अंतरापर्यंत असे ते या दोन कोष्टकांवरून समजून येईल.

       फोटोत जे तीन आकडे दिसत आहेत ते म्हणजे त्या तोफेचे जास्तीतजास्त काटेकोर वजन सांगण्याची पद्धत आहे. तोफेचे वजन तीन अंकांनी दर्शविले जाते आणि डॅशने विभक्त केले जाते. पहिला आकडा 'शंभर वजन' म्हणजे 'Hundredweights' दर्शवतो, दुसरा आकडा एक चतुर्थांश-शंभर वजनांचा आकडा म्हणजे 'Quarter-Hundredweights' सांगतो तर शेवटचा आकडा शिल्लक राहिलेलं वजन सांगतो. या फोटोतल्या संख्येचं उदाहरण पाहू.

     वरील फोटोत '23 - 0 - 26' असं दिसून येतंय. ब्रिटीश सांख्यिकीनूसार जुने शंभर वजन म्हणजे 'Hundredweights हे 112 आधुनिक पौंड्सच्या बरोबरीचे आहे, 100 पौंड्स नाही. या प्रकरणात पहिला अंक संपूर्ण शंभर वजनांची संख्या सांगते (23 x 112 = 2576 पौंड), दुसरा एक चतुर्थांश-शंभर वजनांची संख्या (0 x 28 = 0 पौंड) सांगते तर तिसरा अंक एकक संख्या (26 = 26 पौंड) सांगते. त्यामुळे तोफेचे वजन (2576 + 0 + 26 = 2602 पौंड) आहे म्हणजे सध्या आपण वापरत असलेल्या मेट्रीक पद्धतीत ते 1180.25 किलो आहे.

       आणखी एक उदाहरण पाहू. या फोटोत '23 - 2 - 0' दिसून येतंय. याचा अर्थ या प्रकरणात पहिला अंक संपूर्ण शंभर वजनांची संख्या सांगते (23 x 112 = 2576 पौंड), दुसरा एक चतुर्थांश-शंभर वजनांची संख्या (2 x 28 = 56 पौंड) सांगते तर तिसरा एकक अंक आम्हाला सांगते की कोणतेही वैयक्तिक पाउंड शिल्लक नव्हते. त्यामुळे तोफेचे वजन (2576 + 56 + 0 = 2632 पौंड) आहे म्हणजे सध्या आपण वापरत असलेल्या मेट्रीक पद्धतीत ते 1193.85 किलो आहे.

       वेगवेगळ्या कालखंडात तोफेवर वेगवेगळ्या ठिकाणी संख्या, चिन्हे आणि वाक्यप्रचार कोरण्याची पद्धत रुढ झाली त्यामुळं वर दिलेल्या संख्या किंवा चिन्हे ही प्रत्यक्षात पाहिलेल्या तोफांच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात. असं जरी असलं तरी मुळ मसूदा किंवा संख्येनूसार करावयाची गणिते मात्र बदलत नाहीत.

       उपलब्ध माहितीनूसार हा लेख जास्तीतजास्त अचूक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तरीसुद्धा यात थोड्या प्रमाणात तफावत असू शकते. या लेखनप्रपंचामुळं भटकंती करणारी मंडळी ब्रिटीश तोफांच्या बाबतीत काही प्रमाणात साक्षर व्हावीत हाच एकमेव हेतू यामागं आहे. ब्रिटिश तोफांप्रमाणेच पोर्तुगीज तोफांबद्दल सुद्धा लिहिता येईल त्यामुळं तोफांच्या बाबतीतला हा लेख परिपूर्ण नक्कीच नाही. या विषयावर अजूनही भरपूर लिहिण्यासारखं आहे. जसं तोफांची अंगं आणि त्यांचे उपयोग, तोफगोळ्यांचे प्रकार वगैरे वगैरे. याशिवाय तोफांचं anchoring, त्यांच्या मारगिरीच्या क्षमतेनुसार दोन बुरुजातील अंतर आणि बुरुजात केलेल्या जंग्या, जंग्यांचे कोन, जंग्यामधली अंतरं वगैरे सर्व एक शास्त्र आहे. CAD वर drawing काढून खरंतर ते सुद्धा सविस्तरपणे मांडलं गेलं पाहिजे. तोफांवर लिहिलेले 'वाक्यप्रचार' हा देखील तोफांबद्दलचा एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. याबद्दल लिखाण करण्याचंही डोक्यात आहेच पण सध्या तरी वेळेअभावी ते लिहिणं काही शक्य झालेलं नाहीये. पाहू कधी मुहूर्त लागतो ते.


       माझ्या या लेखन प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहिलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो...

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ॥

बहुत काय लिहिणें, लेखनसीमा ॥

🚩 फोटो सौजन्य -

१) दिलीप वाटवे
२) इतिहासाच्या पाऊलखुणा
३) Google

🚩 संदर्भ -
१) इतिहासाच्या पाऊलखुणा
२) विकीपिडीया



मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

"समग्र हरिश्चंद्रगड"

"समग्र हरिश्चंद्रगड"


'पाच दिवस पंचवीस वाटा'


'आख्यान'


      आम्ही सर्वजण ज्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पहात होतो तो ट्रेकला निघण्याचा दिवस म्हणजे ०७ जानेवारी अखेर उजाडला. आमच्या बहुतेक सगळ्या मंडळींना फक्त रविवारची सुट्टी असते म्हणून शक्यतो आम्ही शुक्रवारी रात्री निघून शनिवार-रविवार असं ट्रेकला जातो म्हणजे ट्रेक संपवून घरी आल्यावर सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करता येतं. यावेळी मुद्दामच आम्ही शनिवारी निघणार होतो याचं कारण एवढंच की समजा पाच दिवसात ठरवलेला कार्यक्रम उरकला नाहीच तर आयत्यावेळी एक जादाची सुट्टी टाकून का होईना पण आम्हाला तो पूर्ण करायचाच होता. शनिवारच्या दिवसभरत आमचं Logistics सांभाळणाऱ्या सगळ्या स्थानिकांना शेवटचा फोन करून रात्री निघत असल्याची वर्दी दिली आणि ग्रुपवर ट्रेकला कायकाय सामान आणायचंय याची यादी आधी पोस्ट केली होतीच त्यानूसार सॅक पण भरली.

       ...अखेर आम्हीच ठरवलेल्या मुहूर्ताची घटका-पळे शेवटी भरलीच त्यामुळं इथून पुढं सगळं शुभ आणि मंगलच होणार होतं. दरवेळी ट्रेकला निघतो त्यापेक्षा यावेळी तासभर लवकर निघायचं ठरवलं होतं त्यामुळं यावेळी थोडी जास्तीची विश्रांती आम्हा सर्वांनाच मिळणार होती. नेहमीप्रमाणे नारायणगावात बजरंगकडे दूधथांबा घेऊन खिरेश्वरला बाळू मेमाणेकडे मुक्कामासाठी दाखल झालो. मुंबईहून अजय शेडगे येताना बैलपाड्याच्या मनोज खाकरला घेऊन नुकताच तिथं येऊन पोहोचला होता. सामान काढून बाळूच्या पार्कींगमधे गाडी पार्क केली. आता ती इथून पाचव्या दिवशीच घराकडं परतीच्या प्रवासाला निघणार होती. सकाळच्या नियोजनाच्या सूचना देऊन फारवेळ टाईमपास न करता सगळे पटकन झोपी गेलो.


🚩 दिवस पहिला 🚩


       सकाळी लवकरच बाळूचं घर सोडलं. आमची पहिली वाट होती ती म्हणजे खिरेश्वरहून गडावर चढून जाणारी तोलारखिंडीची वाट...

🚩 १) तोलारखिंडीची वाट -


       सकाळी ब्राम्ह्य मुहूर्तावर निघाल्यामुळं अजूनही चांगलाच अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात आमची वेगाने चढाई सुरू होती. वाट पायाखालची आणि चांगली मळलेली असल्यामुळं कुठेही न थांबता पुढच्या पन्नास मिनिटांत तोलार खिंडीत दाखल झालो.

       पुढच्या वाटेसाठी इथूनच पुन्हा लव्हाळी बाजूकडं खाली उतरायचं असल्यामुळं पाठीवरचे ब्रम्हराक्षस खिंडीतच ठेवले आणि तडक माथ्यावर पोहोचलो. प्रत्येकाच्या मनात हा ट्रेक पूर्ण करण्याबद्दलचा आत्मविश्वास आणि भावना एवढया तीव्र होत्या की पहिली तोलारखिंडीची वाट एका झपाट्यात म्हणजे फक्त सव्वा तासात पूर्ण झाली होती. दम जिरवण्यासाठी सुद्धा कुणी कुठे थांबलं नव्हतं. सर्वांची मानसिकता चांगली उंचावल्याचंच हे लक्षण होतं आणि ही ट्रेक उत्तम रितीने पार पडण्याच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब होती. तिथंच असलेल्या लव्हाळीच्या नामदेव लाहमटेच्या झापापाशी थोडावेळ रेंगाळलो. आजूबाजूला दिसणाऱ्या परिसराचं थोडक्यात विहंगावलोकन केलं आणि आल्या पावली पुन्हा तोलार खिंडीत उतरायला सुरूवात केली.


🚩 २) तटाची किंवा कडेलोटाची वाट -

 

       आता पुढची वाट होती ती म्हणजे तटाची किंवा कडेलोटाची वाट. ही वाट कोथळे गावातून हरिश्चंद्रगडावर तोलार खिंडीतूनच चढून येते. गप्पा मारत मारत पुन्हा तोलारखिंडीत दाखल झालो. दिलेल्या वेळेनुसार एव्हाना आजचा आमचा लव्हाळीतला वाटाड्या बाळू भांबळे तोलार खिंडीत यायला हवा होता पण तो पोहोचला नसल्यामुळं त्याच्यासाठी तोलार खिंडीतल्या वनविभागाच्या चौकीत निरोप ठेवला आणि कोथळे गावाकडं निघालो. तोलार खिंडीत कुणा पाथरवटानं नवीनच बनवलेली सुबक शिवपिंड पाहायला मिळाली.


       काही अंतर उतरल्यावर कोथळेच्या या मोठ्या वाटेला लव्हाळीकडे जाणारी वाट डावीकडं फुटत होती. कोथळेची मुख्य वाट सोडून डावीकडील पाऊलवाट पकडली तेवढयात बाळू भांबळे येऊन भेटला. दिवसभराचं ठरवलेल्या प्लॕनिंगप्रमाणं निदान आत्तापर्यंत तरी सगळं वेळेत चाललं होतं. ट्रेकींगमधे dependency चा rate जसजसा वाढत जातो तसतसा तुमचा success चा आलेख उतरत जात असतो हे प्लॅनिंग करताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाळू भांबळे वेळेत पोहोचला नसता किंवा आलाच नसता तर दिवसभराचं वेळापत्रक थोडंफार बिघडलं असतं किंवा थोडं बदलावं तरी लागलं असतं पण तो वेळेत आल्यामुळं पुढचं दिवसभराचा नियोजित कार्यक्रम आता उत्तम रितीने पार पडणार होता. कोथळे फाट्यापासून पुढच्या पंधरा मिनिटांत लव्हाळी बाजूला असलेल्या वेताळसोंडेच्या ऊर्फ गणेशसोंडेखालच्या माळावर पोहोचलो. आजच्या लव्हाळी बाजूकडील सगळ्या वाटा याच माळावरून चढून जाणार होत्या. या माळावरच Oleacae family तला Olea dioica म्हणजेच 'पार जांभूळ' चांगलाच बहरला होता.
 
 


🚩 ३) गणपतीची वाट -

 
       तोलार खिंडीच्या उत्तरेकडच्या पहिल्या वाटेचं नाव होतं गणपतीची वाट. ही वाट लव्हाळीतुन गणपतीच्या ठाण्यापाशी चढून जाते म्हणून हिला गणपतीची वाट म्हणतात असं साधं सोपं गणित आहे. माळावरून डावी मारून वाट चढू लागली. चढ बाकी चांगलाच छातीवरचा होता. थोडं अंतर चढून गेल्यावर उजवीकडे खडकावर शेंदूर फासलेला दिसला. बाळूने सांगितलं की हे वरच्या गणपतीचंच छोटं ठाणं आहे. याला स्थानिक उंदिर म्हणतात. या वाटेवर जवळजवळ पंचवीसएक खोदीव पायऱ्या/पावट्या दिसून आल्या म्हणजे ही वाट पुरातन होती. वाटेवर 'जंगली तंबाखू'ला बहर आला होता.

 
 
 

       माथ्यावर पोहोचताना वाटेत तटबंदीचे अवशेष दिसून आले. माथ्यावर पोहोचल्यावर समोरच गणपतीचं ठाणं दिसलं. त्याच्या बाजूलाच असलेल्या एका डेरेदार जांभळाच्या झाडाखाली बसून नाश्ता उरकला. गणपतीच्या ठाण्याच्या खालच्या बाजूला पन्नास जण सहज मुक्काम करू शकतील एवढी मोठी नैसर्गिक गुहा होती ती पण पाहिली. पुन्हा वर येऊन पुढचा ट्रेक उत्तम होण्यासाठी गणपतीला साकडं घातलं आणि आरती म्हणून पुढच्या दरवाज्याच्या वाटेकडे निघालो.

 


  

🚩 ४) दरवाज्याची वाट -

 
       गणपतीच्या ठाण्याच्या उजव्या बाजूने चढ चढून माथा गाठला आणि बरंच पुढे चालत जाऊन थोडं खाली उतरून दरवाज्यापाशी पोहोचलो. समोरच कोथळ्याचा भैरव दिसत होता.

 


       पुढची पायराची वाट पुन्हा याच ठिकाणी चढून येणार असल्यामुळं सॕक तिथंच झाडीत बांधून ठेवल्या आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन दरवाज्याच्या वाटेने उतराई सुरू केली. या वाटेच्या सुरवातीलाच तटबंदीचे, दरवाज्याचे भरपूर अवशेष दिसत होते. वाटही चांगलीच मळलेली होती.







       तासाभरात पुन्हा माळावर पोहोचलो आणि माळावरून थोडी उजवी मारून पाणी भरून घेण्यासाठी खाली उतरलो. इथं मार्च महिन्याच्या सुरवातीपर्यंत पाणी मिळू शकतं. पुन्हा माळावर चढून येऊन पुढच्या पायराच्या वाटेकडे निघालो. माळावर पावसाळी भातशेती केली जाते. भाताची खाचरं ओलांडत माळवरच्या छोट्या वस्तीत पोहोचलो. शेतीच्या कामासाठी बाळूचं आख्खं कुटुंब पावसाळ्यात इथं वस्तीला येतं. पहिल्या दोन दिवसांची राहण्याची, जेवणाची सोय करणाऱ्या पाचनईच्या किरण भारमलच्या अंदाजानुसार आज आम्हाला इथे मुक्काम टाकावा लागला असता त्यामुळं रात्रीच्या जेवणाचा, सकाळच्या चहा-नाश्त्याचा सगळा शिधा घेऊन तो इथं येऊन पोहोचला होता पण त्याचा अंदाज आम्ही साफ चुकवला होता. आज सगळेजण कानात वारं भरलेल्या वारूसारखे दौडत होते. शिधा आणलाच आहे म्हटल्यावर तिथं एक चहाब्रेक घेतला. बाळूशी चर्चा करून पुढील वाटांचा अंदाज घेतला आणि किरणच्या जोडीदाराला म्हणजे सुदामला मुक्कामाच्या ठिकाणाच्या सूचना देऊन परत पाठवून दिलं. सुदाम एकटाच परत गेल्यामुळं आता किरणही आमच्यासोबत पुढचा ट्रेक करणार होता. आता आमची पुढची वाट होती पायराची.

🚩 ५) पायराची वाट -

 
       वस्तीपासून थोडं वरती असलेल्या गणेशसोंडेच्या एका छोट्या पदरात आम्हाला चढून जायचं होतं. पदराच्या खाली सरळसोट कडे असल्यामुळं उजव्या बाजूच्या नाळेतून वर चढून जावं लागणार होतं. वस्तीपुढल्या ढोरवांटामधून योग्य वाट निवडून चढाई सुरू केली. नाळेतून चढून एक अवघड कातळटप्पा पार करून पदरात पोहोचलो. या कातळटप्प्यावर काही खोदीव पावट्या दिसून आल्या. पदरातून दक्षिण दिशा पकडत पुन्हा दरवाज्याच्या दिशेने निघालो. वाटेत दिसलेल्या छोट्या झऱ्याचं पाणी पिऊन तहान भागवली.


 
 


       वाटेत 'Abutilon persicum' म्हणजेच 'मदाम' चांगलाच बहरला होता. थोडं पुढं गेल्यावर उजवीकडे बांबूच्या बनात पूर्वी वस्ती असल्याचं बाळूनी सांगितलं. तिथं पडलेल्या घराची फक्त जोती शिल्लक असल्याचंही त्यानं सांगितलं पण झाडी प्रचंड वाढल्यामुळं आम्हाला काही ती पाहता आली नाहीत. नाही म्हणायला तिथं एक स्मारक शिळा मात्र दिसली. पदरात जागोजागी ओलावा असल्यामुळं अनेक रानफुलं बहरली होती.
 
 

 


       या वाटेला पायरीची वाट म्हाणायचं की पायराची वाट? तर 'पायराची वाट' असं म्हणणं जास्त योग्य आहे असं मला वाटतं कारण या वाटेला पूर्वी वाटेवर असलेल्या एका मोठ्या पायराच्या झाडाची खूण सांगितली जात असे. खरंतर ज्या झाडाची खूण सांगितली जात असे ते झाड सध्या जरी तिथं दिसत नसलं तरी पूर्वी तिथं होतं असं बाळुनी सांगितलं. या वाटेच्या आजूबाजूला आजही पायराची अनेक झाडं दिसून येतात. दुसरं असं की या वाटेला 'पायरीची वाट' असं म्हणण्यासाठी वाटेवर पायऱ्या नाहीत तर पावट्या आहेत आणि दोन्हीत नक्कीच फरक आहे. या ज्या पावट्या आहेत त्या वर वस्तीला असलेल्या मंडळींनी त्यांच्या सोयीसाठी खोदलेल्या होत्या अशी माहीती बाळुने दिली. बरं ही वाट फुटलेल्या तटबंदीतून गडात चढून जात असल्यामुळं ही गडाची पुरातन वाट नक्कीच नव्हती त्यामुळं वाटेवरच्या पावट्या पुरातन नक्कीच नाहीत. थोडक्यात काय तर या वाटेला 'पायरीची वाट' म्हणण्यापेक्षा 'पायराची वाट' म्हणणंच जास्त संयुक्तिक वाटतं. असो, पुढच्या अवघड टप्पा पार करून फुटलेल्या तटबंदीतून पुन्हा गडात प्रवेश केला. तिथं जवळच म्हणजे दरवाज्याच्या वाटेच्या आणि पायराच्या वाटेच्या माथ्यावर पाणी जाण्यासाठी खोबणी केलेली दिसून आली.



🚩 ६) गवळ्याची नळी -

       दरवाज्याच्या वाटेवर ठेवलेल्या सॅक उचलल्या आणि वेताळसोंडेच्या टोकावर असलेल्या वेताळाच्या मंदिराकडं निघालो. दुपार झाली होती आणि पोटात कावळेही ओरडू लागले होते पण वेताळाच्या ठाण्याजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ जाऊनच जेवायचं ठरवलं होतं. वेताळाकडे जाताना वाटेत एका ठिकाणी दगडाच्या पॉटहोल्समधे पाणी साठलेलं दिसल्यावर तिथंच जेवायचं ठरवलं. खरंतर डोक्यावरचं उन मी म्हणत होतं पण या गणेशसोंडेवर सावलीत बसून जेवता येईल असं एकही झाड कुठे दिसत नव्हतं त्यामुळं उन्हात बसूनच जेवणं उरकण्याशिवाय पर्यायच नव्हता. पुढच्या गवळ्याची नळी आणि वेताळधार ऊर्फ त्रिंबकसोंड करून पुन्हा इथूनच जायचं असल्यामुळं सॅक इथंच ठेवल्या आणि पुढं निघालो. वाटेत पहिल्यांदा पाण्याचं टाकं दिसलं आणि थोडं पुढं गेल्यावर वेताळाचं ठाणं.

 
       वेताळाच्या ठाण्यावरून वाट सरळ सोंडेच्या टोकाकडं निघाली होती. टोकाच्या थोडं अलिकडं उजवीकडं वळून आम्ही गवळ्याच्या नळीने उतरू लागलो. या वाटेवर इतका प्रचंड घसारा होता की या वाटेनी चढून येणं परवडलं असतं असं शेवटी शेवटी वाटायला लागलं.
 

 
 
       घसाऱ्याची वाट संपता संपेना पण एक बरं होतं की अर्धी वाट उतरल्यावर बाजूला धरायला कारवी होती. सहसा कुठं पहायला मिळत नाही अशी एक गोष्ट इथं पहायला मिळाली ती म्हणजे झाडांसाठी असलेलं इथलं पोषक वातावरण. या वातावरणामुळं कारवीच्या झाडांचे वृक्ष झाले होते. चारचार पाचपाच इंच जाडीची कारवीची खोडं इथं पहायला मिळाली. कढीपत्त्याची पानं पाहूनही खरं वाटेना इतकी मोठी पानं होतात कढीपत्त्याला. सोबत असलेले धनंजय शेडबाळे आणि धनंजय कोकाटे ही जोडी जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती याविषयात अभ्यासू होती त्यामुळं आम्हाला बऱ्याच झाडाची ओळख, त्यांचं महत्व याची माहिती आपोआपच मिळत होती. या दोघांनाही तिथल्या पोषक वातावरणाबद्दल चांगलंच अप्रूप वाटत होतं.
       घसारा एकदाचा संपला आणि आम्ही माळावर पोहोचलो. इथून वेताळधारेची सुरूवात हाकेच्या अंतरावर होती. सगळी मंडळी आल्यावर दहा मिनिटांची विश्रांती घेतली आणि वेताळधारेच्या वाटेची चढाई सुरू केली.
 
 

 🚩 ७) वेताळधार ऊर्फ त्रिंबकसोंड -

 

       आजची ही आमची सातवी वाट होती. नारायणराव अस्ताला निघाले होते त्यामुळं आता घाई करायला हवी होती. वेताळधारेचा चढ चांगलाच अंगावर येणारा होता पण उन्हाचा चटका कमी होऊ लागल्यामुळं फारसं दमायला होत नव्हतं. उजवीकडं नाप्त्यामागं सुर्यास्त होत होता. आकाशात रंग गडत होत चालले होते. त्या रंगात पेठेच्या वाडीचा कोंबडा आणि कलाडगड, कुमशेतचा कोंबडा, आजोबा, करंडा, कात्राबाई न्हाऊन निघाले होते. कितीतरी वेळ आम्ही त्यांच्याकडं पहात बसलो होतो. तेवढ्यात बाळूची 'लवकर चला' म्हणून हाळी आली आणि भानावर आलो. खरंच काही ठिकाणं अशी असतात जी मंत्रमुग्ध करून टाकतात.

 

       दोनतीन सोपे रॉकपॅचेस पार करत वेताळधारेचा माथा गाठला. माथ्यावर भक्कम बुरूजाचं बांधकाम आहे. पाचनई, लव्हाळी भागावर या टोकावर असलेल्या बरूजावरून चांगलं लक्ष ठेवता येत असल्यामुळं सामरिकदृष्ट्या हा बुरूज महत्वाचा असावा. वेताळधारेच्या टोकावरून परतत असताना गवळ्याची नळी, वेताळधारेवरच्या पाण्याच्या टाक्या, वेताळाचं ठाणं पहात सॅक ठेवलेल्या जागेपर्यंत येईपर्यंत अंधार पडला. खरंतर प्लॅनिंगनूसार इथंच कुठतरी मुक्काम करायचं ठरवलं होतं पण अजून थोडं ताणलं तर आणखी एक वाट करून सुरक्षित ठिकाणी म्हणजे पाचनईच्या देवाच्या वाटेवर असलेल्या मंगळगंगेच्या ओढ्यात मुक्कामाला जाता येणार होतं. सोबत्यांच्या मनातलं थोडं चाचपलं तर सर्वांनीच त्याला तयारी दाखवली आणि आमची पायगाडी एका ओळीत थनरगडीकडं निघाली. या वाटेकडं जाताना अंधार पडल्यामुळं या वाटेचे फोटो काही काढता आले नाहीत.



🚩 ८) थनरगडी -

 

       खिरेश्वरहून तोलारखिंडीतून चढून गडमाथा गाठल्यावर हरिश्चंद्रेश्वराकडं जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक बालेकिल्ल्याच्या बाजूने तर दुसरी थोड्या खालच्या बाजूने. या खालच्या बाजूने जाणाऱ्या वाटेला लागलो आणि मंदिराकडं निघालो. जाताना वाटेतच थनरगडीची वाट सुरू होते. ज्या मंडळींना खिरेश्वरहून थेट पाचनईला जायचं आहे त्यांना हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत जायची गरज पडत नाही. ते या थनरगडीने सरळ पाचनईच्या देवाच्या वाटेवर येऊ शकतात. ही वाट खास त्याच मंडळींसाठी आहे. आज आम्हीही त्याच मंडळींमधले एक झालो होतो. थनरगडीची वाट सरळ सोंडेवरून जात अगदी शेवटच्या ठिकाणी ओढ्यात उतरत होती. तासाभरात या वाटेनी देवाच्या वाटेवर पोहोचलो तोपर्यंत पायराच्या वाटेखाली सोडलेला किरणचा जोडीदार सुदाम मुक्कामाचं, जेवणाचं सगळं साहित्य घेऊन तिथं पोहोचला होता.
       जेवण तयार होईपर्यंत आम्ही टेंट लावले. थंडी चांगलीच जाणवू लागली होती म्हणून शेकोटी पेटवली आणि दिवसभरात केलेल्या वाटांची पुन्हा एकदा उजळणी केली. तेवढ्यात जेवण तयार झाल्याची हाक आली आणि जेवायला गेलो. बहूतेक ट्रेकला प्लॅस्टीकचा कचरा किमान आपल्यामुळं तरी होऊ नये म्हणून आम्ही घरूनच जेवायला ताटं, ग्लास वगैरे घेऊन जातो. आम्हाला आता ती सवयच होऊन गेली आहे. ट्रेकला निघालं की आपोआप ताट सॅकमधे भरलं जातं, कुणाला सांगावंच लागत नाही. ट्रेकर्स मंडळींनी ही सवय लावून घेतली आणि प्रत्येक गडावर आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाचं say 'No' to plastic हे आचरणात आणण्यासाठी प्रबोधन केलं तर आज प्रत्येक गडावर आपण पहात असलेली कचऱ्याची समस्या सहजी सुटेल.
       आमच्या आजच्या प्लॅनिंगनूसार जेवढ्या वाटा करायचं ठरवलं होतं त्यापेक्षा एक वाट जास्तीची झाली होती त्यामुळं उद्या थोडा आराम मिळणार होता.


🚩 दिवस दुसरा 🚩

 

       पाचनई गावातून चढून येणाऱ्या चार वाटा आम्ही मुक्काम केलेल्या ठिकाणापासूनच वेगवेगळ्या होत होत्या. पाचनई गाव ते आमच्या मुक्कामाचं ठिकाण थनरगडीपासून कोकणकड्याच्या वाटेपर्यंतच्या पाचही वाटांसाठी एकच होतं. आमचा कालचा मुक्काम याच ठिकाणी करण्याचं हेच एक कारण होतं. या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं आणि सकाळच्या चारही वाटा करताना आम्हाला आमचं सामान वागवायची गरज पडणार नव्हती. एकूण इथल्या पाच वाटांपैकी पहिली थनरगडी आम्ही कालच रात्री उतरून आलो होतो त्यामुळं अनुक्रमणेनुसार आजची पहिली वाट होती देवाची वाट.
 

🚩 ९) देवाची वाट -

 
       पाचनई गावातून बहूतेक सगळी पर्यटक मंडळी साधारण तासाभरात याच वाटेने गडावर चढून येतात त्यामुळं वाटेचा हमरस्ता झालेला दिसत होता. या ठिकाणावर उतरणारी आमची शेवटची कोकणकड्याची वाट पुन्हा इथंच उतरून येणार असल्यामुळं सगळ्या सॅक बेसकँपवरच ठेऊन निघालो. रस्ता वाहता असल्यामुळं इथं सुदाम सामानावर लक्ष ठेवण्यासाठी थांबणार होता तर किरण खाली गावात जाऊन आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवणार होता. देवाच्या वाटेने चढून हरिश्चंद्रेश्वर मंदिर गाठलं. नेमकी आजच्याच दिवशी हरिश्चंद्रेश्वराची वारी त्र्यंबकेश्वराला निघाली होती त्यामुळं वारीतल्या वारकऱ्यांच्यात सामील होऊन थोडा हरिपाठाचा आनंद घेतला. पुढं हरिश्चंद्रेश्वर मंदिरात जाऊन आमच्या कोकणात घालतात तसं हरिश्चंद्रेश्वराला गाऱ्हाणं घालून आरती केली. बहूतेक सगळ्या शंकराच्या मंदिराच्या पायरीवर असलेल्या किचकाची गोष्ट सोबत्यांना सांगून पुढच्या कपारीच्या वाटेकडं निघालो.
 





🚩 १०) कपारीची वाट -

 
       हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागचा चढ चढून मागच्या हॉटेलांपाशी आलो आणि उजव्या दांडावरून आडवी मारली. हीच ती कपारीची वाट जी पुन्हा आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरून जात होती. यावाटेने उतरून खालच्या ओढ्यात आलो. या वाटेवर कपारीसदृश असं काहीच नव्हतं तरीसुद्धा या वाटेला कपारीची वाट का म्हणतात ते काही कळलं नाही. ओढ्यात उतरल्यावर उजवीकडं कँपसाईटवर न जाता डाव्या बाजूला वळून पुढच्या सात पायरीच्या वाटेला लागलो.
 



🚩 ११) सात पायरीची वाट -

 
       ही सात पायरीची वाट खालच्या ओढ्यातून कपारीची वाट ज्या हॉटेलांपासून सुरू होते तिथंच पण कोकणकड्याच्या बाजूने चढून येते. ओढ्यातून आडवं जात पायऱ्यांच्या खाली आलो आणि पायऱ्या चढूनच वर आलो. इथं असलेल्या एकूण पायऱ्या पाहिल्या तर त्या दोन टप्प्यात होत्या. पहिल्या टप्प्यात ६२ पायऱ्या आणि त्याच्या बाजूलाच ०७ पावट्या खोदलेल्या होत्या तर वरच्या दुसऱ्या टप्प्यात १९ पायऱ्या दिसून आल्या. एवढ्या पायऱ्या असल्यामुळं या वाटेचं मूळचं नाव 'साठ पायऱ्यांची वाट' असं असावं का? असा मनात विचार आला त्यामुळं नंतरच्या काळात नावात अपभ्रंश होऊन हीला सात पायरीची वाट असं नाव पडलं असावं असं सहज वाटुन गेलं. ही वाट आम्ही पुढे करणार असलेल्या बैलघाटाशी संलग्न असावी. बैलघाटाने चढून आल्यावर हरिश्चंद्रेश्वर मंदिर गाठण्यासाठी ही वाट अत्यंत सोयीची आहे.





🚩 १२) कोकणकड्याची वाट -

 
       सात पायऱ्यांच्या वाटेवरून चढून आल्यावर उजवी मारून मंदिरापासून कोकणकड्यावर जाणाऱ्या वाटेला लागलो आणि कोकणकडा गाठला. शनिवार-रविवार नसल्यामुळं बहूतेक सगळी हॉटेलं बंद होती. त्यातल्याच एका उघड्या असलेल्या हॉटेलात चहाची ऑर्डर दिली आणि कोकण कड्यावर गेलो. सोबत्यांना कोकणकड्यावरून दिसणारा परिसर सांगितला तेवढ्यात चहा आला.


          चहा पिऊन कोकणकड्याजवळ असणाऱ्या फुटक्या धरणाच्या भिंतीतून कोकणकड्याच्या वाटेने उतरायला सुरूवात केली.  'पाचनईकरांना कोकणकड्यावर जाण्यासाठी शॉर्टकट' असं या वाटेला फारफार तर म्हणता येईल. ही वाट पूर्णपणे एका ओढ्यातून उतरत होती. हीला 'वाट' म्हणता येईल अशी ही वाटच नव्हती.
 
 



 
        वाटेवर कुणीच नसल्यामुळं सगळीकडं कमालीची शांतता होती त्यामुळं आमच्या सोबत असलेल्या साहेबराव पुजारींमधला योगशिक्षक जागा झाला आणि त्यांनी सगळ्यांकडूनच अकरा ओंकार म्हणून घेतले. या ओंकारामुळं वातावरण इतकं भक्तीमय झालं की पुढचा कितीतरी वेळ आम्ही सगळे डोळे मिटून एकाग्र होऊन बसून राहिलो होतो. धनंजय शेडबाळेंनी आवाज दिला आणि सगळे भानावर आले.
       ओढ्यातल्या कोकणकड्याच्या वाटेने उतरून कँपसाईटला आलो, सॅक उचलल्या आणि पाचनई गावात आलो. किरणने जेवणाची तयारी करून ठेवलीच होती त्यामुळं हातपाय धुवून लगेच जेवायलाच बसलो. जेवणानंतर पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतला आणि आजच्या आमच्या पुढच्या वाटेकडं निघालो.


🚩 १३) गायवाट -

 
       गावातून बाहेर पडून डांबरी रस्त्यावरूनच पेठेच्या वाडीकडे चालू लागलो. थोडं अंतर गेल्यावर रस्ता सोडून डावी मारली आणि वाटेची चढाई सुरू केली. पाचनईच्या समोर असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या टोकाच्या खालच्या बाजूने वाट गडावर चढून जात होती. नावातच 'गाय' असल्यामुळं वाट अगदी ऐसपैस होती पण ही ढोरवाट फक्त माळापर्यंतच मोठी होती पण पुढं मात्र ती अगदी छोटी आणि अवघड झाली. कातळटप्प्याला भिडल्यावर डावीकडं आडवं जात तटबंदीतून आत गडात गेलो. या वाटेला तटबंदी, दरवाजा असल्यामुळं ही वाट पुरातन असावी आणि हीच पाचनईची गडावर जाणारी मूळ वाट असावी. गायवाटेने गोलाकार ट्रॅव्हर्सी मारून बैलघाटाच्या माथ्यावर आलो.


🚩 १४) बैलघाट -

 
       ही वाट माझ्या चांगल्याच परिचयाची होती. नुकताच या वाटेने मी उतरलो होतो. या वाटेवर हरिश्चंद्रगडाच्या गडपणाच्या सगळ्यात जास्त खूणा दिसून येतात. दगड रचून केलेली पाखाडी किंवा फरसबंदी, दरवाजा, भरभक्कम बुरूज आणि एकाखाली एक असलेले तटबंदीचे अवशेष असं सगळं दिसून आलं. दरवाज्यानंतर धोंडे आळीतून उतरत पायथ्याशी पोहोचलो. सादडे घाटासाठी किंवा कलाडगडाशी संपर्क ठेवण्यासाठी या वाटेचा उपयोग होत असावा. एकूणच ही वाट पूर्णपणे झाडीतून होती त्यामुळं उन्हाचा फारसा त्रास जाणवला नाही. आता आमची पुढची वाट होती ती परिचितराईची.
 


 

 
 

 

🚩 १५) परिचितराईची वाट -

       बैलघाट उतरून डावी मारली आणि परिचितरायाच्या वाटेकडं निघालो. थोडं अंतर सपाटीवरून चालल्यावर गर्द रानातल्या वाटेने चढू लागलो. थोड्या वेळात वाटेने एका मोकळ्या पठारावर आणून सोडलं. इथून समोर खरंतर हरिश्चंद्रगडाचे कडेच दिसत होते मग वाट होती कुठे? बारीकशा वाटेने चढून छोट्या कातळटप्प्याला जाऊन भिडलो. सराईत मंडळी सोडली तर नवख्यांनी इथं रोपचा वापर केलेलाच बरा असा तो समोर आलेला कातळटप्पा होता. कातळटप्पा चढून वरच्या मोठ्या कारवीला दोर बांधला आणि सगळी मंडळी एकएक करत वर चढून आली. कातळटप्प्याच्या माथ्यावर डावी मारून बाजूच्या ओढ्यात पोहोचलो.


       पोटभर थंडगार पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि उजव्या अंगाने पुन्हा चढाई सुरू केली. पुढच्या पंधरा मिनिटांत नळीच्या वाटेने कोकणकड्यावर चढून जातात त्या वाटेला येऊन मिळालो. प्लॅनिंगनुसार आजचा आमचा मुक्काम या वाटनाक्यावर करायचं ठरलं होतं पण सुर्यास्ताला अजून भरपूर वेळ असल्यामुळं अजूनही दोनतीन वाटा सहज होणार होत्या. अर्थात सोबत्यांना याबाबत सांगून आपण आजचा मुक्काम पुढं करूया काय विचारल्यावर सर्वांनीच तयारी दाखवली.
       कोकणकड्यावर या वाटेने आधी बरेचदा येऊन गेल्यामुळं ही वाट आमच्या चांगलीच परिचयाची होती. या वाटेने खाली उतरून नळीच्या वाटेच्या खिंडीत पोहोचलो. आता इथून डावीकडं नळीची वाट होती तर उजवीकडं बेटाची नळी. आम्हाला नळीची वाटेने बैलपाड्यात जायचं होतं पण त्याआधी अजून तीन वाटा करायच्या बाकी होत्या.


 

🚩 १६) बेटाची नळी -

       खिंडीतून उजवी मारून बेटाच्या नळीने उतरायला सुरूवात केली. ही वाट अतिशय सोपी, आरामात उतरत जाणारी होती. या वाटेवर उंचच उंच आणि भलेमोठे वृक्ष पहायला मिळाले. या वाटेचं हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. हरिश्चंद्रगडाच्या आत्तापर्यंत केलेल्या कुठल्याच वाटेवर एवढे मोठे वृक्ष पहायला मिळाले नव्हते. एवढ्या दाट झाडीतून उतरताना उन लागत नसल्यामुळं कुठंही न थांबता पाचनईच्या पठारावर आलो. रतनगड ते हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करणाऱ्यांना गडावर जाण्यासाठी ही बेटाची नळीची वाट अतिशय जवळची आहे. पाचनईच्या पठारावर आल्यावर किरण भेटला. आमचा आजचा मुक्काम याच पठारावर होता पण सुर्यास्तापर्यंत आणखी दोन वाटा सहज होणार होत्या त्यामुळं किरणला रात्रीच्या जेवणाची आणि मुक्कामाची तयारी करायला सांगून सादडे घाटाकडं जायला निघालो.






🚩 १७) सादडे घाट -

       हरिश्चंद्रगडावर या सादडे घाटाची वाट जरी थेट चढून येत नसली तरी ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर चढून जाण्यासाठी या घाटवाटेचा वापर केला जातो त्यामुळं या वाटेला हरिश्चंद्रगडाची संलग्न असलेली वाट असं नक्कीच म्हणता येईल. बैलपाडा आणि केळेवाडी गावातून या घाटवाटेने पाचनईला चढून येता येतं. हरिश्चंद्रगडाच्या सगळ्या वाटांबरोबरंच त्याच्या संलग्न आणि सध्याच्या परिस्थितीत गडाच्या वापरात असलेल्या वाटाही करण्याचं आम्ही ठरवलं होतं. सादडे घाटवाट अतिशय वाहती वाट आहे. पाचनईच्या पठारावरून घाटमाथ्यावर पोहोचलो आणि सादडे घाट उतरायला सुरूवात केली. सुरवातीला धोंडेआळीतून उतरावं लागणार होतं. घाटवाटेत असलेलं पाण्याचं टाकं, पायऱ्या ही वाट महत्वाची आणि वाहती असल्याचंच सांगत होत्या. नाळेच्या ओपनबुकमधून बाहेर पडल्यावर मातीचा प्रचंड घसारा सुरू झाला. डाव्याबाजूला सिलेंडर सूळका लक्ष वेधून घेत होता तर खालच्या बाजूला कोकणात केळेवाडी स्पष्ट दिसत होती. सावधतेनी उतरत सादडे घाटातल्या करपदऱ्याच्या तिठ्यापाशी पोहोचलो. सरळ उतरत सादडे घाटाची वाट केळेवाडी, बैलपाड्यात निघून गेली आणि आम्ही उजवीकडं वळून करपदऱ्याने चढाई सुरू केली.

 
 



🚩 १८) करपदरा -

       करपदऱ्याची वाट ही खासकरून पेठेच्या वाडीतल्या मंडळींची. सादडे घाटातून चढून पेठेच्या वाडीत जायचं तर सीतेचा डोंगर आणि कलाडगडाला वळसा मारून जावं लागतं म्हणून हा करपदऱ्याचा शॉर्टकट. स्थानिक भाषेत अंजनीच्या झाडाला करप म्हणतात. या वाटेवर करपाची झाडं खूप असल्यामुळं या वाटेला नाव पडलं करपदरा. या वाटेला पण हरिश्चंद्रगडाची संलग्न असलेली वाट असं म्हणता येईल. करपदऱ्याने चढून बाजूच्याच हपाट्याच्या कड्यावर आलो. सुर्यास्त होतच होता आणि अशा कड्यावरून सुर्यास्त पाहणं म्हणजे स्वर्गसुखच. सूर्यास्त पाहिल्यामुळं दिवसभराचा शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला. सुर्यास्त पहात उरलेला वेळ कसा गेला ते कळलंच नाही.





 
 
       प्लॅनिंग करताना दिलेल्या यादीतल्या जवारीची नाळ, गोधनीची वाट आणि माशाचा लोळ या कोकणातून चढून येणाऱ्या घाटवाटा सध्या वापरात नसल्यामुळे पूर्णपणे मोडल्या आहेत त्या वाटा याच हपाट्याच्या कड्याच्या परिसरातच चढून येतात. पूर्वी या वाटा आम्ही केल्या होत्या त्यामुळं नवीन मंडळींना त्या वाटा कशा चढून येतात त्याचं इत्यंभूत वर्णन केलं, त्यांचे घाटमाथे दाखवले आणि पेठेच्या वाडीच्या कोंबड्याच्या बाजूने मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झालो.
 


       किरणनी टेंट लावून ठेवले होते आणि जेवणही बनवून ठेवलं होतं त्यामुळं आज आम्हाला काहीच काम नव्हतं. बाजूच्या ओढ्यावर जाऊन हातपायधुवून फ्रेश झालो आणि ताटं घेऊन जेवण्यासाठी हजर झालो. आमच्या आजच्या प्लॅनिंगनूसार थनरगडीपासून परिचितरईच्या वाटेपर्यंतच्या आठ वाटा करायचं ठरवलं होतं त्यापेक्षा दोन वाटा जास्तीच्या झाल्या होत्या म्हणजे कालची एक आणि आजच्या दोन मिळून तीन वाटा जास्तीच्या झाल्या होत्या. त्यामुळं उद्या नळीच्या वाटेने बैलपाड्यात उतरून अर्धा दिवस आराम करायचं ठरवलं होतं.



 

🚩 दिवस तिसरा 🚩

 

🚩 १९) नळीची वाट -

 

       आज फक्त नळीची वाटेने उतरून बैलपाड्यात जाऊन मुक्काम करायचं ठरवलं होतं त्यामुळं थोडं उशीराच निघालो. कँपसाईटवरच नाश्ता केला आणि निघालो. आज परत आम्हाला बेटाची नळी चढून जायचं होतं ती चढून नळीच्या वाटेच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. सुरवातीच्या घसाऱ्यावरून उतरून पहिल्या कातळटप्प्यापाशी आलो. रोप फिक्स केला आणि एकएक करत सगळे उतरलो. बाकीचे उतरेपर्यंत आम्ही काहीजण पुढे जाऊन दुसऱ्या कातळटप्प्यावर रोप फिक्स केला. या वाटेनी आत्तापर्यंत बरेचदा चढाई-उतराई केली होती त्यामुळं कुठं वेळ लागतो, कुठं सावधगिरी बाळगायला हवी, कुठं पाणी मिळेल, कुठं फोनला रेंज येते, कुठल्या झाडाखाली बसून आराम करता येईल हे तोंडपाठ झालं होतं. मजल-दरमजल करत एकदाचे बैलपाड्यात येऊन दाखल झालो. आगाऊ सूचना देऊन ठेवल्यामुळं जेवणही तयार होतं. काहींनी हातपाय धुतले तर काहींनी आंघोळी केल्या आणि जेवण करून चांगली झोप काढली. हा अर्ध्या दिवसाचा आराम आम्हाला पुढच्या कठीण वाटांसाठी खूपच गरजेचा होता.
 
 



 
 
  
 

 
 

 
 

 
  
 

 
       हाताशी असलेला वेळ थोडा सत्कारणी लागावा म्हणून आम्ही काही मंडळी गावातल्या आश्रमशाळेला भेट देण्यासाठी गेलो आणि आश्रमशाळेत राहणाऱ्या २०० मुलं आणि १५२ मुलींची lifestyle जाणून घ्यायचा प्रयत्न केला. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेली ही मुलं आपल्या घरापासून लांब राहून शिक्षण घेत होती. काही मुलं तर पार वाडा, जव्हार भागातून शिकण्यासाठी आली होती. बहुतेक ही सगळी मुलं आदिवासी पाड्यातली होती की ज्यांच्याकडं शिक्षण ही दुय्यम गरज समजली जाते. निसर्गसंवर्धन, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज वगैरेवर मुलांशी सूसंवाद साधण्याच्या निमित्तानं अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी आम्ही खरंतर तिथं गेलो होतो.
       ही आश्रमशाळा अनुदानीत असूनही शाळेला मिळणारी सरकारी मदत अतिशय तुटपुंजी होती. सोईसुविधांचा अभाव असूनही ही मुलं तिथं कशी राहतात? स्वच्छतेसंबंधी त्यांच्या काही समस्या आहेत काय? हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. विपरीत परिस्थितीत राहूनही मुलं शिक्षण घेत आहेत म्हटल्यावर काय लागेल ती मदत करण्याचं आश्वासन आम्ही शाळेतल्या शिक्षकवृंदाला देऊन आलोय. पाहूया कसं जमतंय ते...  

 

🚩 दिवस चौथा 🚩

 

       कालच्या अर्ध्या दिवसाचा चांगला आराम झाल्यामुळं आज सगळे एकदम ताजेतवाने झाले होते. आज आम्हाला एकूण चार वाटा करायच्या होत्या. त्यातल्या दोन वाटा Technical होत्या. त्यातूनही पहिली वाट जास्त अवघड होती ती म्हणजे माकडनाळ.
 

🚩 २०) माकडनाळ -

 

       भल्या पहाटेच मनोजच्या घरून डबा बांधून निघालो. उजाडेपर्यंत नळीची वाट आणि माकडनाळेच्या संगमावर पोहोचलो होतो. मनोज थोडा मागून येणार होता पण वाट माहितीची असल्यामुळं ते चालणारं होतं. निघाल्यापासून फक्त सव्वा तासात मनोज यायच्या आधीच रॉकपॅचपर्यंत आम्ही पोहोचलोही होतो. सुरक्षा साधनं काढून Climbing केलं आणि हळूहळू सगळ्यांना वर घेतलं. झूमार असल्यामुळं वजनी सॅकही विनासायास वर घेता आल्या. माकडनाळेच्या माथ्यावर सगळे पोहोचेपर्यंत साधारण अकरा वाजले होते. इथं जेवायचं तर पाण्यासाठी वाट वाकडी करून आडराईतल्या पायराच्या पाण्यापर्यंत जावं लागलं असतं आणि ते आम्हाला परवडणारं नव्हतं. त्यापेक्षा लगेचच रोहिदास घळीने खाली उतरून वेळ्याच्या पाण्यापाशीच थांबायचा निर्णय घेतला.
 

 




 



🚩 २१) रोहिदास घळ ऊर्फ थितबीची नाळ -

 

       भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले होते पण थेट पाण्यापाशीच थांबायचं ठरलं होतं. सुरवातीला मस्त झाडोऱ्यातून वाट उतरत होती. ही नाळवाट असल्यामुळं घसारा बाकी प्रचंड होता. जागोजागी झाडांवर सांबरांनी शिंगं घासल्याच्या खूणा दिसून येत होत्या. अर्धी नाळ उतरल्यावर एक मोठा टप्पा लागला म्हणून मग उजव्या झाडीतून आडवं जात पुढच्या छोट्या नाळेतून मुख्य ओढ्यात उतरलो. इथून बाकी झाडी संपून उन्हाचा तडाखा सुरू झाला. वेळ्याच्या पाण्यापाशी पोहचल्यावर हातपाय धुवून फेश झालो. हे वेळ्याचं पाणी बारमाही वाहत असतं. जेवण करून थोडी वामकुक्षी घेतली आणि थोडं खाली उतरलो. सरळ जाणारी वाट थितबीत निघून गेली आणि आम्ही डाव्या बाजूने आडराईतून उतरलेल्या ओढ्यात शिरून पुढच्या तवलीच्या नाळेने चढू लागलो.




 
 

 

🚩 २२) तवली -

       तवलीची नाळ अतिशय अणकुचीदार आणि चांगली झाडोऱ्यातून होती. उन नसल्यामुळं चढाईला जरी त्रास होत नसला तरी कोकणातला दमटपणा चांगलाच जाणवू लागला होता त्यामुळं चांगलंच थकायला होत होतं. थोड्याच वेळात झाडोऱ्यातून बाहेर पडलो आणि उन्हाचा तडाखा लागू लागला. मूळातच अणकुचीदार असलेली नाळ जसजसं वर जाऊ तसतशी जास्तच अणकुचीदार होऊ लागली. कातळ तापल्यामुळं चढाईच्या छोट्या टप्प्यांवर चढाई करताना हात चांगलेच भाजू लागले आणि जसजसं वर जाऊ तसा घसाराही वाढू लागला. माथा समोरच दिसत होता त्यामुळं फारवेळ हा त्रास सहन करावा लागणार नव्हता. कुठेच न थांबता माथ्यावरच्या कारवीत घुसलो आणि शेवटचा भिडू येईपर्यंत थोडं पुढं जावून एका डेरेदार झाडाच्या सावलीत बसलो. इथून डावीकडं आडराई, त्याच्या वरची बाणवसराई आणि त्याच्याही वरती असलेला खराट्याचा पुड दिसत होता. समोरच जुन्नर दरवाज्याची वाट, त्याच्या वाटेवरचं नेढं, बुध्या डोंगर, पाठराई, काळू आणि रेठीचा झुरा धबधबे, खुबीचं एमटीडीसी रिसॉर्ट, सिंदोळा, हडसर, भणभणी, गायदरा, उधळ्या, तिवई, घोण्या, एकतंगडी, माळशेज आणि शिवाजी घाटवाटा, भोजगिरी आणि दौंड्यापर्यंतचा सगळा भाग दिसत होता. उद्या चढाई करायची असलेली तारामती घळ एका पठारामागं लपल्यामुळं संपूर्णपणे काही दिसत नव्हती. बसलेल्या ठिकाणी हवेची झुळूकही अधनंमधनं छान येत होती त्यामुळं परिसर न्हाहाळत किती वेळ इथं बसून होतो तेच समजलं नाही. अंधाराच्या आत किमान पुढची खुर्द्याचा दरा ऊर्फ खुर्द्याची धार उतरून सपाटीला लागायला हवं होतं. बरं पुढच्या वाटेवर Exposure पण होता त्यामुळं काळजीनं उतरावं लागणार होतं.


 
 
 



 

🚩 २३) खुर्द्याचा दरा ऊर्फ खुर्द्याची धार -

       डेरेदार झाडापासून उतरायला सुरवात केली. वाटेवर प्रचंड घसारा होता पण धरायला कारवी असल्यामुळं फारसं काही वाटलं नाही. हा घसारा पुढची वाट कशी आहे तेच जणू सुचवत होता. काळजी तर घ्यावीच लागणार होती. समोरच खालच्या बाजूला बुधलीची खिंड दिसत होती तिथंचं आम्हाला उतरायचं होतं. बऱ्यापैकी मोठ्या असलेल्या झाडाला रोप बांधला आणि उतरायला सुरूवात केली. गरजेच्या ठिकाणी मेखाही ठोकल्या. शेवटच्या टप्प्यावर Rappling चा सेटअप लावला. वर बिले द्यायला मनोज होताच. एकएक जण Rappling करत बुधलीच्या खिंडीत आले. इथून पुढची वाट धारेवरच्या घसाऱ्याची होती पण धरायला कारवी असल्यामुळं चिंता नव्हती त्यामुळं बुधलीच्या खिंडीपासून सगळे पाऊण तासात खाली आलो. आजच्या सगळ्या वाटा झाल्या होत्या पण मुक्काम तारामती नाळेतल्या ओढ्यात न करता थोडं लांब पडलं तरी वाघ्याच्या वाडीत जाऊनच करायचं ठरवलं होतं. अर्थात त्याला कारणही तसंच होतं.
       वाघ्याच्या वाडीतल्या पहिल्या घरातच मुक्कामासाठी चौकशी केली जी विनासायास मिळाली. मनोजच्या घरून त्याचे वडील भाकऱ्या घेऊन आले होतेच. घरातल्या चुलीवरच पिठलं बनवलं आणि जेवण करून झोपी गेलो ते उद्याच्या तारामती घळीला भिडण्यासाठीच.







 

🚩 दिवस पाचवा 🚩

 

🚩 २४) तारामती घळ -

       सकाळी थोडं उजाडल्यावरच निघालो. वाटेत बिबट्याच्या पायांचे ठसे जागोजागी दिसत होते. संध्याकाळी खुर्द्याचा दरा उतरताना मनोजने वडिलांना भाकऱ्या घेऊन येण्यासाठी फोन केला होता तेव्हा त्यांच्याकडून एक वाईट बातमी समजली होती. बैलपाड्यातून वाघ्याच्या वाडीला येण्याच्या बाजारच्या वाटेवर मनोजच्या शेतात बांधलेल्या भल्यामोठ्या रेड्याची आदल्या रात्रीच बिबट्याने शिकार केली होती. या भागात बिबट्यांचा मुक्त वावर आहे हे समजल्यामुळंच तारामती नाळेत मुक्काम न करण्याचं ठरवलं होतं. अर्थात सोबत्यांना मुद्दामच हे काल कळून दिलं नव्हतं पण आज ट्रेकला सुरूवात केल्यावर बाकी सांगितलं होतं. हे कळल्यावर मात्र कुणी एकमेकात जास्त अंतर न ठेवता एकत्रच चालत होते.

       तारामती घळीची ही वाट आत्तापर्यंत आमच्यापैकी कुणीच केलेली नव्हती त्यामुळं सुरवातीला वाटेची थोडी शोधाशोध करण्यात तासभर वाया गेला खरा पण नंतर मात्र ती मिळाल्यावर मात्र थेट आडव्या ट्रॅव्हर्सीपाशीच जाऊन थांबलो. ही १५० फुटांची ट्रॅव्हर्सी मात्र भयानकच होती. डाव्याबाजूला उंचचउंच कडा तर उजव्या बाजूला २५०-३०० फुटांचा सरळसोट ड्रॉप. ज्याला धरून ट्रॅव्हर्सी मारायची ते दगडही सगळे लूज झालेले. सुरवातीला दोन पिटॉन होते पण त्यानंतर असलेल्या दोन Expansion Bolt मधल्या हँगरप्लेटच कुणीतरी काढून नेल्या होत्या. आपल्या मागून येणाऱ्या ट्रेकर्सना त्रास होऊ नये याची काळजी वाटून प्रसंगी पदरमोड करून तिथं हँगरप्लेट सोडून जाणारी मंडळी कुठे आणि आपल्यामागून येणाऱ्या ट्रेकर्सशी आपल्याला काय देणंघेणं या घाणेरड्या मानसिकतेतून त्याच हँगरप्लेट काढून नेणारी मंडळी कुठे. खरंच इतक्या अनवट जागी येणारी माणसं इतकी नतद्रष्ट कशी असू शकतात याचंच राहूनराहून नवल वाटत होतं. आमच्याकडं मेखा असल्यामुळं सुरक्षेसाठी तिथं एक तात्पुरती मेख मारली आणि सगळ्यांनी ती ट्रॅव्हर्सी सुरक्षितपणे ओलांडली.








       जेवणाची वेळ झालीच होती त्यामुळं जी मंडळी ट्रॅव्हर्सी मारून येत होती ती एकएक करून त्यांची जेवणं उरकून घेत होती. सगळ्यांची जेवणं झाल्यावर थोडी विश्रांती घेतली, फोटो काढले आणि नाळ चढायला सुरूवात केली. वाटेत मिळालेल्या ओढ्यात पाणपिशव्या पुन्हा भरून घेतल्या. नाळेच्या आजूबाजूला असलेला अंजन चांगलाच बहरला होता. उन-सावलीत आमची नाळेतल्या दगडावरून चढाई सुरू होती तेवढ्यात एक सांबर थोड्या अंतरावरून बाजूच्या जंगलात शिरलं. या भागात मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळं एकूणच इथला निसर्ग समृद्ध असल्याचंच हे लक्षण होतं. थोड्या चढाईनंतर आडराईत जाणारी वाट ओलांडली. आता इथून पुढची वाट आमच्या चांगल्या ओळखीची होती.

 

 
 



       सकाळपासून चढत होतो पण ही धोंडेआळी काही संपायचं नाव घेत नव्हती. पुणे व्हेंचरर्सच्या चार दिवसांच्या बेसिक कोर्समधे Rock climbing Techniques चे जेवढे प्रकार आम्ही मुलांना शिकवतो तेवढे सगळे करून झाले होते. Three point climbing, Bouldering, Hand Holds, Foot holds ची पार आवर्तनं होवून बोटं फुटायला लागली होती. शेवटीशेवटी असं वाटायला लागलं की चार दिवसांत जेवढं मुलांना शिकवतो तेवढं एकाच तारामती घळीच्या चढाईत सगळं शिकवता येईल. Jokes apart पण तारामती घळ आमच्या सर्वांच्या सहनशक्तीचा अंत बघत होती हेच खरं.
       मजल-दरमजल करत एकदाचे घळीच्या मुखाशी पोहोचलो. इथून थेट चढाई करता येत नाही म्हणून डावी मारून बाजूच्या कारवीत शिरलो. इथल्या कातळटप्प्यावर तटबंदीचे अवशेष दिसत होते. उजव्या नाळेतून चढाई करून माथा गाठला आणि बालेकिल्ल्याच्या वाट चौकात पोहोचलो. वाघ्याच्या वाडीपासून इथपर्यंत यायला आम्हाला तब्बल नऊ तास लागले होते.
       कोकणातून घाटमाथा गाठणाऱ्या सर्वात जास्त लांबीच्या आणि अवघड प्रकारात मोडणाऱ्या वाटांमधे तारामती घळीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. या वाटेसाठी कातळारोहण तंत्र आणि त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा साधनांचा सुयोग्य वापर करता यायला हवा. त्याशिवाय पुरेशी शारिरीक आणि मानसिक क्षमता असेल तरच या वाटेच्या नादी लागावं.
       वाटनाक्यापासून डाव्या वाटेने बालेकिल्ल्याला वळसा मारून तोलार खिंडीत जाता येतं पण आम्हाला जुन्नर दरवाज्याच्या वाटेने उतरायचं असल्यामुळं आम्ही उजवी मारली आणि  जुन्नर दरवाज्याच्या वाटेचा उतार सुरू होतो तिथं पोहोचलो.

 
 
 
 

🚩 २५) जुन्नर दरवाज्याची वाट -

 

       ही वाट आमच्या पायाखालची होती. त्यामुळं इथून दोन तासात खिरेश्वर गाठता येईल याचा पक्का अंदाज होता. घड्याळ सहा वाजल्याचं दाखवत होतं त्यामुळं खाली बाळू मेमाणेला जेवण बनवायला सांगून वाट उतरायला सुरूवात केली. थोडं खाली उतरल्यावर उजव्या बाजूला थोडी वाट वाकडी करून लेणी गाठली. तिथलं थंडगार पाणी पिऊन पाणपिशव्या भरून घेतल्या आणि खाली उतरून जुन्नर दरवाज्याच्या वाटेवरल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचलो.
 
 
 
 

 
       सूर्य अस्ताला निघाला होता त्यामुळं आता घाई करायला हवी होती. तसंच थोडं पुढं जाऊन खोदीव पावट्यांपाशी पोहोचलो. या भागात असलेल्या सपाटीवर चौकीचे अवशेष दिसून येत होते की जे या वाटेची प्राचीनता सांगत होते. वाट चांगली मळलेली होती आणि उतरताना तिच्या गत आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. बऱ्याच वर्षांपूर्वी मी या वाटेने उतरत असताना पाचनईची काही मंडळी चढून येताना दिसली. ही मंडळी लग्नासाठी मढला गेली होती. गप्पा मारतामारता त्यांना वाटेबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की ती मढहून खालच्या वसईवाडीपर्यंत चालत येऊन तिथून पुढं वरच्या वसईवाडीत आली होती आणि तसंच पुढं सिंदोळ्याच्या बाजूने खुबीला आली होती. खुबीतून खिरेश्वरला जाण्याऐवजी जुन्नर दरवाज्याने चढून पुढं थनरगडीने पाचनईत उतरणार होती. मढहून ओतूर - ब्राम्हणवाडा - कोतूळ - विहिर - लव्हाळी आणि पाचनईला गाडीरस्त्याने येण्यापेक्षा त्यांच्यासाठी चालत जाण्याचा मार्ग कधीही कमी वेळाचा, कमी खर्चाचा आणि कुठलीही Dependency नसलेला होता. स्थानिक मंडळींकडून याही गोष्टी खरंतर ट्रेकर्स मंडळींनी शिकायला हव्यात आणि ट्रेक प्लॅनिंग करताना त्याचा पुरेपूर उपयोग देखील करायला हवा.





       वाटेवरच्या प्राचीनत्वाच्या खुणा पाहत खिरेश्वरला बाळू मेमाणेच्या घरी पोहोचलो आणि जशी सॅक काढून खाली ठेवली तसे डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. कुणाशीही न बोलता स्वस्थपणे दहा मिनिटं बसून राहिलो तेव्हा कुठं भानावर आलो. गेले पाच दिवस आम्ही सगळे एका वेगळ्याच झपाटलेल्या वातावरणात वावरत होतो. तो बांध आज एकदम फुटला होता. दहा मिनिटांनी जेव्हा मनावरचा ताण जाऊन भानावर आलो त्याक्षणी एकदम हलकंहलकं वाटू लागलं होतं. सर्वांना एवढा आनंद झाला होता की सगळ्यांनी एकमेकांना चक्क मिठ्या मारून आनंद व्यक्त केला.

       शेवटी हा ट्रेक प्लॅनिंग करण्यापासून ते जसाच्या तसा तो एकझिक्युट करण्यापर्यंतच्या सर्वच पातळ्यांवर अतिशय आव्हानात्मक असा होता पण तो तसा असूनही अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे पूर्ण झाला होता. अशा प्रकारच्या आव्हानात्मक ट्रेकचं प्लॅनिंग करताना बऱ्याच गोष्टी एक लिडर म्हणून मला कराव्या लागल्या. 'समग्र हरिश्चंद्रगड' विस्तृतपणे तुम्हा सर्वांपुढे मांडण्याचं कारण एवढंच की नंतर कुणाला अशा प्रकारच्या ट्रेक्सचं आयोजन करायचं असेल तर अशा प्रकारच्या ट्रेकमधे कोणत्या गोष्टी प्रयत्नपूर्वक अंमलात आणाव्या लागतात हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावं हेच आहे. 

 


🚩 उ) समारोप --

 

🚩 उ - १) सहकाऱ्यांचं मनोधैर्य, प्रेरणा --

 

        वाटांचा क्रम मुद्दामच counter clockwise म्हणजे घडाळ्याच्या काट्याच्या उलट ठेवला होता असं मी पहिल्या भागात सांगितलं होतं. अर्थात हे असं करायचं आम्ही का ठरवलं होतं याचं कारण आता सांगतो. पहिल्या दोन दिवसांतच तोलारखिंड ते बेटाची नळीपर्यंतच्या १६ आणि सादडे घाट, करपदरा धरून १८ वाटा आमच्या करून झाल्या होत्या. कोकणातल्या वाटा मोठ्या असूनही २५ मधल्या १८ वाटा पहिल्या दोन दिवसांतच झाल्यामुळं एकूणच सगळ्या संघावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला त्यामुळं लव्हाळी, पाचनईकडील वाटा आधी संपवून टाकण्याचं प्लॕनिंग केलं होतं. नंतरच्या कोकणातल्या घाटवाटा अवघड असूनही त्या सर्व संघाच्या वाढलेल्या मनोधैर्यामुळं करणं आम्हाला खूपच सोपं गेलं.
       पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण टिमचं मनोधैर्य टिकवून ठेवणं, ते कायमच उच्च ठेवणं, वेळोवेळी सहकाऱ्यांना प्रेरणा देत राहणं ही ट्रेक लिडरची जबाबदारी असते आणि त्या परीक्षेत केवळ योग्य प्लॕनिंगमुळं मी पहिल्या दोन दिवसांतच उत्तीर्ण झालो. समजा हच क्रम उलटा केला असता तर पहिल्याच दिवशी जुन्नर दरवाज्याची वाट आणि तारामती घळ अशा दोन्ही दिग्गज वाटा कराव्या लागल्या असत्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा तवली, खुर्द्याचा दरा, रोहिदास घळ आणि माकडनाळ करावी लागली असती. या प्लॕनिंगमधे आमच्या दोन दिवसांत फक्त सहाच वाटा झाल्या असत्या आणि संपूर्ण टिमचं मनोधैर्य खालावलं असतं. संपूर्ण टिमचं मनोधैर्य ट्रेक संपेपर्यंत उच्च ठेवण्याची जबाबदारीही लिडरला पार पाडावी लागते. योग्य प्लॕनिंगमुळं 'दोन दिवसांतच एवढया वाटा केल्यात तर पुढच्याही उडवून टाकू' ही मानसिकता त्यातून आपोआपच तयार झाली आणि ट्रेक लिडर म्हणून माझं निम्मं काम तिथंच झालं. 'मनोधैर्य टिकवणं हे नेत्याचं काम असतं' हे वाक्य जरी युद्धभूमी वरून आलेलं असलं तरी ट्रेकींगचं क्षेत्रही त्याला कसं अपवाद असेल? नाही का?
       शिवकाळात घडलेले याचे दोन उत्कृष्ट दाखले आपल्याला सभासद बखरीत वाचायला मिळतात. दोन्ही वेळेस प्रत्यक्ष 'भवानी देवी' महाराजांच्या स्वप्नात आली होती. पहिला दाखला मिळतो तो अफजलखान वधाच्या प्रसंगी तर तर दुसरा मिर्झा राजे जयसिंग भेटीच्या वेळी.
 

🚩 उ - २) ट्रेकची अंमलबजावणी, वाटांची माहिती, ठिकाणं --

 

       ट्रेक लिडरला काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागतात हे बिबट्याच्या प्रसंगावरनं सर्वांच्या लक्षात आलं असेलच पण काही गोष्टी मुद्दाम सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. ट्रेकपूर्वी झालेल्या मिटिंग्समधे एकूणच सगळ्या वाटा कशा आहेत, कुठे आहेत, त्याचा अवघडपणा किती आहे किंवा आपल्याला कुठे आणि किती काळजी घ्यावी लागेल, चालणाऱ्या संघाचा म्होरक्या कोण असेल आणि पाठीराखा कोण असेल, प्रत्येकाची जबाबदारी काय असेल वगैरे सगळ्या चर्चा ट्रेकपूर्वीच्या मिटिंग्समधे झाल्यामुळं प्रत्येकाला हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणं ही काही प्रमाणात वैयक्तिक जबाबदारी वाटू लागली आणि तिथंच हा ट्रेक अर्धा यशस्वी झाला होता. कधीकधी लिडरला असंही करावं लागतं.
 

🚩 उ - ३) शिस्त --

 

       आम्हा फाल्कनच्या प्रत्येक ट्रेकमधे एक गोष्ट कसोशीने पाळली जाते ती म्हणजे शिस्त. थोडक्यात सकाळी सहा वा़जता सुरू होणारा ट्रेक बरोबर सहा वाजताच सुरू होत होता. ट्रेकची आखलेली दिवसभराची सगळी गणितं ही वेळेवरच अवलंबून असतात त्यासाठी Reverse Engineering चं तंत्र लिडरने उपयोगात आणलेलं असतं त्यामुळं सकाळचं गणित चुकलं की पुढची सगळी गणितं आपोआपच चुकत जातात. जी गोष्ट वेळेची तीच प्रत्येकाने सामाईक सामान उचलण्याची. प्रत्येकाने जे सामाईक सामान आहे ते बरोबरीने उचलायला हवं आणि ते प्रत्येकजण उचलतोय की नाही याची खात्री दररोज लीडरने करायला हवी.

       ट्रेकमधे फक्त काही जणांवरच कामाचा भार पडू नये म्हणून प्रत्येकाला थोडीफार कामं नेमून दिली जातात. एखाद्याने काम केलं नाही तर साहजिकच त्याच्या कामाचा ताण दुसऱ्यावर पडतो आणि त्याची तक्रार लगेचच लीडरकडे येते. अशावेळी तिचं वेळीच निराकरण, तेही कुणाचं मन न दुखवता होणं गरजेचं असतं. 'Home Sickness' आल्यामुळं अशा वेळी छोट्या छोट्या खटक्यांचं पर्यवसान मोठ्या भांडणात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सगळ्या ग्रूपचं बाँडींग निदान ट्रेक संपेपर्यंत तरी रहावं यासाठी असं 'Damage Control' ट्रेक लिडरला वेळीच करावं लागतं. हे असं जर वेळीच झालं नाही तर पुढे जाऊन खुप मोठी समस्या उभी राहते. हे असं प्रत्येक ट्रेकला, खास करुन जंबो ट्रेकला तर हे दररोज करावंच लागतं. प्रत्येक जंबो ट्रेकमधे आम्ही हे जसं करतो तसं याही ट्रेकला दररोज संध्याकाळी यासाठी थोडा वेळ राखून ठेवला होता. रात्रीच्या जेवणानंतर वेळात वेळ काढून न चुकता आम्ही हे काम करत होतो.
 

🚩 उ - ४) दृढनिश्चय --

 

       ट्रेकमधे सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे दृढनिश्चय. 'हा ट्रेक कितीही अवघड असला तरी आपण तो उत्तम रितीने पूर्ण करणार आहोत' असा दृढनिश्चय एकदा का तुम्ही केलात की आपोआपच तुमची पावलं त्याच्या यशाकडं वळू लागतात. यश मिळेपर्यंत ट्रेक लिडरने सोबत्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता उच्च ठेवण्यासाठी कायमच त्यांना Motivate करणं, प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. स्वयंशिस्त, समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चय या बळावरच यशाचं शिखर गाठता येतं हे ट्रेक लिडरने नेहमीच लक्षात ठेवायला हवं. फाल्कन्सच्या प्रत्येक ट्रेकमध्ये योग्य प्लॅनिंगसोबतच ही गोष्ट ट्रेक लिडर कसोशीने पाळत असतो त्यामुळं आम्ही ठरवलेले अवघड, अनवट ट्रेक्सही उत्तम रीतीने पूर्ण होतात आणि असे उत्तम रीतीने पूर्ण झालेले ट्रेक्स अप्रत्यक्षपणे तुमचा आत्मविश्वास वाढवतच असतात.

 उ - ५) पर्यावरणपूरक ट्रेकिंग --

 

       ही गोष्ट हल्ली फारच महत्वाची झाली आहे. प्लॅस्टीकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हरिश्चंद्रगडावर असलेल्या प्रत्येक हॉटेलमधे जेवणासाठी प्लॅस्टीकच्या डिश दिल्या जातात. फक्त हरिश्चंद्रगडावर नाही तर प्रत्येक किल्ल्यावर हेच चित्र दिसून येतं. एक ट्रेकर म्हणून आपली पहिली हीच जबाबदारी आहे की आपण स्वतः प्लॅस्टीकचा वापर टाळला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही तो करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे किंवा त्यांच्यात जागरूकता तरी निर्माण केली पाहिजे. यासाठी आम्ही फाल्कन्स प्रत्येक ट्रेकला जाताना जेवणासाठी घरून ताटल्या घेऊन जातो. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कधीच विकत घेत नाही तर नेलेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतो. इतकी वर्ष मी ट्रेकींग करतोय पण डोंगरातलं पाणी पिऊन मी आजारी पडलोय असं कधीच झालेलं नाही. अर्थात हा अनुभव प्रत्येक ट्रेकरला आला असेलच.
 

🚩 उ - ६) स्थानिकांच्या समस्या समजावून कार्यरत राहणे --

 

       याचाच एक भाग म्हणून आम्ही फाल्कन्सनी जे वचन बैलपाड्यातल्या आश्रमशाळेच्या शिक्षकवृंदाला दिलं होतं त्याच्या वचनपूर्तीसाठी ट्रेकहून आल्यावर ०९ फेब्रुवारीला आम्ही पुन्हा शाळेला भेट देऊन मुलांसाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी देऊन आलो. खरंतरं 'एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या' हाताला सुद्धा कळू देऊ नये असं म्हणतात पण हे इथे हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे आपल्यासारख्या सुखसोयींनीयुक्त अशा जीवनमानात जगत असलेल्या शहरी मंडळींची परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत असलेल्या मंडळींना मदत करणे ही नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं म्हणूनच इथं मुद्दाम सांगावंसं वाटलं. आम्ही शाळेला कोणत्या वस्तू दिल्या हे वाचून तुम्हाला अशी मदत करायची झालीच तर त्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत हे नक्कीच समजून येईल.

१) Incinerator for Girls
२) ४०० कापडी पिशव्या
३) ग्रंथालयासाठी २५० पुस्तके
४) १२ देशी रोपे

# या व्यतिरिक्त आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून नेहमीच येणाऱ्या आणि इतरही ट्रेकर्ससाठी डोंगरदऱ्यात धोका पत्करून ट्रेक घडवून आणणाऱ्या बैलपाड्याच्या मनोज खाकरचा आम्ही पाच लाखांचा विमा उतरवला आहे आणि दरवर्षी त्याचं नूतनीकरण देखील करणार आहे. तैलबैलाची घटना ताजी आहे. जाणाऱ्या माणसाच्या मागं त्याच्या कुटुंबाची वानवा होऊ नये म्हणुन आम्हा फाल्कन्सचा हा छोटासा प्रयत्न.

       भूगोलाच्या आणि पर्यावरणाच्या सखोल अभ्यासासोबतच निसर्ग संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची योग्य सांगड घालत आम्ही ही भटकंती पूर्ण केली. अशा प्रकारे केलेली भटकंती तुम्हाला कायमच पुढील भटकंतीसाठी प्रेरणा देत असते. आमचंही काहीसं असंच झालंय. सह्याद्रीतल्या अशा अनगड वाटेवरच्या डोंगरयात्रा तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीपेक्षाही जास्त मानसिक सक्षम आणि निर्णयक्षम बनवत असतात. एवढंच नाही तर तुमच्यात प्रचंड सहनशीलता देखील निर्माण करतात. लेखाच्या शेवटी समर्थांचे काही निवडक श्लोक सांगून थांबतो...

सावध चित्ते शोधावे ।
शोधोनी अचूक वेचावे ।
वेचोनी उपयोगावे ।
ज्ञान काही ॥

जितुके काही आपणासी ठावे ।
तितुके हळुहळु सिकवावे ।
शाहाणे करूनी सोडावे ।
बहुत जन ॥

शरीर परोपकारी लावावे ।
बहुतांच्या कार्यास यावे ।
उणे पडो नेदावे ।
कोणी येकाचे ।।

 
बहूत काय लिहिणें। लेखनसीमा।

🚩 🚩 🚩

 
🚩 नकाशा -
१) हरिश्चंद्रगड नकाशा गुगलवरून साभार 
२) २५ वाटांचा to scale नकाशा निनाद बारटक्के यांच्याकडून

🚩 फोटो -
१) प्रवीण सोनवणे
२) शिवाजी शिंदे
३) राजेंद्र क्षीरसागर
४) अजय शेडगे
५) जितेंद्र परदेशी
६) संजय मालूसरे

🚩 संदर्भ -
१) विकिपीडिया
२) सभासद बखर
 

समाप्त.