शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

"भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत"

"भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत"


       आपण भटके मंडळी पाहिजे तसं भटकु शकतो ते केवळ घरून मिळणार्‍या पाठींब्यामुळेच, खरं म्हणजे या गोष्टीला कुणाही भटक्याचा आक्षेप नसावा. पण असा पाठींबा मिळवण्यासाठी प्रत्येकाला त्यासाठी काहीना काहीतरी कष्ट घ्यावेच लागतात. मग घरच्यांना घेऊन हॉटेलींग, पिक्चर पाहणे असो किंवा घरची कामं, सासुरवाडीतील कार्यक्रम, मुलांचा अभ्यास घेणे असो. अर्थात माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी मी सांगितलेल्या पर्यायात नक्की भर घालू शकतील यात काही शंकाच नाही. त्यातल्या त्यात लग्न झालेल्यांना तर त्यासाठी फार मोठं प्लॅनिंग करावं लागतं. प्रत्येकाला भटकायला जाण्याची परवानगी मिळण्यासाठी अधुनमधुन मोबाईल सारखं घरच्यांचं 'रिचार्ज' मारावं लागतं. नाही म्हणायला प्रत्येकाचं ड्युरेशन बाकी वेगवेगळं असु शकतं.
पावसाळ्यानंतर येणार्‍या थंडीत ट्रेकींगला जायला परवानगी मिळण्यासाठी मलाही असंच रिचार्ज मारावं लागणार होतं. मग आता घरच्यांना घेऊन फिरायला जायचं कुठे?

       थंड हवेच्या ठिकाणातील घाटमाथ्यावरची लोणावळा-खंडाळा, ताम्हिणी, माळशेज, महाबळेश्वर, आंबोली ही ठिकाणं पर्यटकांच्या अत्यंत आवडीची. पावसाळ्यात तर अशा ठिकाणी गर्दीचा महापुर लोटलेला असतो. पण हल्ली दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांमुळे कुटुंबासह फिरायला जाणाऱ्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्यातरी जिथं अशा हुल्लडबाजांचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी जायचं नक्की केलं होतं. ते ठिकाण म्हणजे भीमाशंकर जवळचं "आहूपे". केवळ आडबाजुलाच असल्यामुळं हुल्लडबाजी करणारे पर्यटक कमी किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल.

       तसं व्यवसायाच्या आणि ट्रेकींग निमित्तानं माझं स्वतःचं बर्‍यापैकी फिरणं होतं. पण निदान पुढच्या ८-१० ट्रेक्ससाठी तरी परवानगी मिळण्यास काही अडचण येऊ नये, म्हणून अधुनमधुन कुटुंब देवतेलाही प्रसन्न करणं गरजेचं होतं. त्यामुळे काहीही झालं तरीही ९ जुलैचा रविवार फक्त कुटुंबासाठी राखुन ठेवला होता. स्वतःच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याची वेळ ट्रेकींग करणार्‍या भिडूंवर तशी क्वचितच येते. त्यामुळे माझ्यासारख्याच समदु:खी ट्रेकर्स सोबत आहुपे जाण्याचं नक्की केलं होतं.

       आहूपे म्हणजे तसं माझ्या परीचयाचं ठिकाण. ट्रेकींगच्या निमित्ताने मी बर्‍याच वेळा तिथे गेलोय. त्यामुळे गावात चांगली ओळख होती. आगाऊ कल्पना देऊन ठेवल्याने जेवणाखाण्याचा प्रश्न पण मिटलेलाच होता. नियोजन तर व्यवस्थित झालं होतं. आता फक्त निघायचंच बाकी होतं.

       ठिकाण तर ठरलं होतं आहूपे आणि त्याच्यासोबत माळीण, पण याच्याबरोबर अजुन काही वेगळं पाहता येईल काय? अशी चर्चा चालू असताना सोबत येणाऱ्या मनोज शेडबाळकरने घोडेगाव जवळच गिरवलीला असणारी 'आयुकाची वेधशाळा' पाहता येईल असं सुचवलं. मग सर्वांनीच ते उचलून धरलं. त्याच्याच आयुकातला मित्राने गिरवलीसाठी लागणार्‍या परवानगीची व्यवस्थाही लगेच केली. काहीतरी वेगळं बघायला मिळणार म्हणुन सर्वजण खुपच उत्साहात होते.

       आता कुणी कुठं यायचं? कुणाला कुठं पीकअप करायचं? किती वाजता निघायचं? म्हणजे दिवसभरात ठरवलेला कार्यक्रम पुर्ण होईल आणि वेळेत घरी परतता येईल वगैरे अगदी व्यवस्थित ठरवलं होतं. कुटुंब सोबत असल्यामुळे निघायला होणार होता तसा शेवटी अर्धा तास उशीर झालाच. पण आधीच तो गृहीत धरल्याने दिवसभराच्या कार्यक्रमावर तसा फारसा काही फरक पडणार नव्हता.


       सकाळी निघाल्यावर पुणे-नाशिक महामार्गावर भामा नदी ओलांडली आणि हॉटेल भामला एक छोटासा टि-ब्रेक घेतला. तसं भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरहुन धोपट मार्ग आहे पण त्याच्या थोडे अलिकडे असलेल्या पेठमार्गे घोडेगावला जायला शॉर्टकट असल्याने वेळ वाचवण्यासाठी मधूनच जाण्याचं ठरवलं. काही अंतर गेल्यावर एक छोटासा घाट लागला. तिथुन समोरच गिरवलीची वेधशाळा स्पष्ट दिसत होती. पावसामुळे आसपासचा परिसरही हिरवागार झाला होता त्यामुळे खुपच सुंदर दृष्य दिसत होतं. शेवटी रहावलं नाही म्हणून काही क्षण तिथे मुद्दाम थांबलोच.



       आता बाकी पोटातले कावळे ओरडून नाष्ट्याची वेळ झाल्याचं सांगत होते. पुढे वेधशाळा पहायला जवळजवळ दोनएक तास तर सहज मोडणार होते. त्यामुळे गिरवलीला जाण्याआधी घोडेगाव बाजारपेठेत असलेल्या 'न्यु इंडिया रेस्टॉरन्ट' मधे जाऊन प्रसिद्ध कढी-वड्यावर यथेच्य ताव मारला.


       घोडेगावातुन गिरवली गाव फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे. पण वेधशाळा गिरवली गावातुन आणखी पुढे सहा किलोमीटरवर डोंगरावर आहे. गावातील शाळेच्या बाजुनेच वेधशाळेकडे जाण्याचा रस्ता आहे. तसा फलकही तिथे पहायला मिळतो.


       इथुन पुढच्या झाडांनी आच्छादलेल्या आणि वळणावळणाच्या घाटाच्या रस्त्याने जाताना अगदी कोकणात असल्याचाच भास होत होता.



       आयुका वेधशाळेच्या गेटवर परवानगीचे सर्व सोपस्कार पार पाडले. दुर्बीण पहायला येणार्‍या प्रत्येक गटाला वेधशाळेच्या प्रतिनिधीकडून वेधशाळेची इत्यंभुत माहिती दिली जाते. तसं आज आम्हाला वेधशाळेची माहीती देण्यासाठी दिलीप पाचर्णे सर येणार होते. ते या वेधशाळेत असणार्‍या दुर्बीणीच्या देखभालीचे काम पाहतात.



       आयुका (IUCAA) वेधशाळेची घोडेगावजवळ असणार्‍या गिरवली गावाबाजुच्या डोंगरावर एक दुर्बीण आहे. जी पुण्यापासुन फक्त ८० किलोमीटर अंतरावर आहे. ती दुर्बीण तिथंच स्थापित करण्याचं मुख्य कारण म्हणजे दळणवळणाच्या दृष्टीने सोइस्कर ठिकाण. आडबाजुला टेकडीवर असल्यामुळे आजूबाजूच्या असणाऱ्या गावातल्या उजेडाचा दुर्बीणीच्या फोटो घेण्याच्या क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. खगोलशास्त्राच्या संशोधकांच्या गरजा भागवण्यासाठी आणि मुख्यत्वेकरून विद्यार्थ्यांसाठी या दुर्बीणीची स्थापना केली गेली. टेलीस्कोप टेक्नॉलॉजीज लिमीटेड (लिव्हरपुल UK) या टेलीस्कोप तयार करणार्‍या कंपनीने या दुर्बीणीची निर्मिती केली आहे. या दुर्बीणीचा प्राथमिक अंतर्गोल आरसा दोन मीटर व्यासाचा असुन दुसरा आरसा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. या दुर्बीणीचा आयुकाला प्रदान सोहळा १३ मे २००६ रोजी प्रा. यश पाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

       ही दुर्बीण पावसाळ्यात बंद असल्याने आम्हाला मात्र ती बंद स्थितीत पहावी लागली. पण साधारणपणे ती ऑक्टोबर ते मे दरम्यान फक्त रात्रीच्या वेळेस चालु अवस्थेत पाहता येते. त्यामुळे या दुर्बीणीची संपुर्ण माहिती करून घेण्यासाठी आणि चालु अवस्थेत असताना पाहण्यासाठी या काळात परत एकदा तरी यावेच लागेल.









       वेधशाळा पाहण्यात दोन तास कसे गेले ते समजलंच नाही. आहुप्यात जेवणाचं सांगुन ठेवलं होतं त्यामुळे आता आम्हाला माळीण पाहून आहूपेला जेवणाच्या वेळेपर्यंत पोहोचायलाच हवं होतं. त्यामुळे सर्वांना थोडी घाई करावीच लागणार होती. फार वेळ न घालवता डिंभ्याला आलो. इथून सरळ जाणारा रस्ता भीमाशंकरला जात होता तर उजवीकडे वळून जाणारा रस्ता डिंभे धरणाच्या भिंतीच्या लगत माळीणला. धरणात साठवलेल्या पाण्याच्या बाजुबाजुने जाताना वाटेत छोटी छोटी गावे लागली. आजची आमची सर्व भटकंतीची ठिकाणे आंबेगाव तालुक्यातली होती. तर मग हे आंबेगाव नेमकं आहे तरी कुठे? तर हे मुळचं आंबेगाव हे डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्यानं विस्थापित करावं लागलं. त्यामुळं गावातील सर्व मंडळी मंचर, घोडेगाव, पाणलोट क्षेत्राच्या बाजुलाच असणारं फुलावडे आणि डिंभे गावात विस्थापित झाली. फार पुर्वीपासुन घोडनदीच्या खोर्‍यातलं हे मुख्य गाव असल्यानं तालुक्याला 'आंबेगाव' असं नाव ठेवलं गेलं. आम्ही माळीणकडे जाताना रस्त्यातुन धरणाच्या पाण्यातुन वर डोकावणारा एक कळस दिसत होता नेमकं तिथंच हे आंबेगाव होतं. खोर्‍यातलं हे मुख्य गाव असल्यामुळं इथं पुरातन मंदीरं नक्कीच असणार. आत्ता आम्हाला जो कळस दिसत होता ते एक जैन मंदीर होतं. त्याच्या बाजुलाच विश्वेश्वर मंदिरही आहे. जसं पुण्याहुन भोरला जाताना गुंजन मावळात अमृतेश्वराचं पुरातन मंदीर आहे ना अगदी तसंच. हा अमृतेश्वर म्हणजे शिळीमकर देशमुखांचं कुलदैवत. हे मंदीर मात्र पाण्यात बुडालेलं नाही. पण पवना, चासकमान धरणात अशी मंदीरे बुडालेली माझ्या माहितीत आहेत. खरं म्हणजे शिवकाळात किंवा त्यापुर्वी सुद्धा पंचक्रोशीतल्या लोकांचं दैवत हे महादेवच. त्यामुळे प्रत्येक खोर्‍यात, नेर्‍यात आणि मावळात ( खोरं, नेरं आणि मावळ या संज्ञांविषयी पुन्हा केव्हातरी) महादेवाची पुरातन मंदीरे असायलाच हवीत. अशा या पाण्यात लुप्त झालेल्या असंख्य मंदीरांविषयी थोडा शोध घ्यायलाच हवा.

       वाटेत लागलेली छोटी छोटी गावे पार करत रस्ता माळीण फाट्यापर्यंत गेला. तिथेच दुर्घटनाग्रस्त लोकांना तात्पुरते राहण्यासाठी पत्र्याच्या शेड उभारलेल्या दिसल्या. ओढ्यावरचा पुल ओलांडून पाचच मिनीटात माळीणमधे पोहोचलो. गावातल्या शाळेमागे असणारे पण भुस्लखनात अर्धे वाहून गेलेले घर पाहून एकदम अंगावर काटा आला. काय घडलं असेल त्या रात्री? कल्पनाच करवत नव्हती. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. बाजूला हल्लीच १५१ मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ स्मारक उभारलेलं दिसलं. गेलेल्या प्रत्येकाची आठवण कायम रहावी म्हणून वनविभागाने प्रत्येक मृत व्यक्तीच्या नावाने एक एक स्वदेशी वृक्षाची लागवड केलेली दिसली. जोपर्यंत ही झाडं आहेत तोपर्यंत त्याची आठवण कायम राहील ही कल्पना मनाला खुपच भावली. पुढे निघणार इतक्यात नजर एका ओढ्याच्या मोरीवर गेली तिथे कुणीतरी लिहुन ठेवलेलं दिसलं 'एक होतं माळीण'.








       माळीण सोडल्यावर मात्र कुठेही न थांबता तडक माझ्या मित्राचं, ज्ञानेश्वरचं घर गाठलं. हातपाय धुऊन होईस्तोवर गरमगरम जेवण समोर आलं. एकतर भयानक भुक लागली होती, त्यात पावसाळी वातावरणात असं गावरान जेवण म्हणजे मेजवानीच. मग काय सर्वांनीच जेवणावर यथेच्य ताव मारला. नंतर हक्काची वामकुक्षी पण घेतली आणि थोड्या वेळाने कोकण कड्यावर फिरायला गेलो. सुरवातीला थोडा पाऊस होता, ढगही होते त्यामुळे काही बघायला मिळेल का नाही याबद्दल शंकाच होती. पण थोड्यावेळाने पावसाने उघडीप दिल्याने गोरखगड, मच्छिंद्र सुळका, आहुपे घाट, खोपीवली गाव स्पष्ट दिसु लागले. भीमाशंकरची वाट, भट्टीचं रान, आहुप्याच्या वाड्या तर अगदी निसर्ग चित्रात चितारल्यासारख्या दिसत होत्या.

       संध्याकाळ होऊ लागली होती त्यामुळे आता सर्वांनाच हळूहळू घरचे वेध लागू लागले होते. कोकणकड्यावर फारवेळ न काढता गावात परतलो. गरमागरम चहा घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आहुप्याला येताना जेवणासाठी उशीर झाल्यामुळे वाटेतली भैरवनाथाची देवराई पाहता आली नव्हती. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. यातली झाडं तोडली तर देवाचा कोप होतो अशी गावकऱ्यांची श्रध्दा. पण तरीसुद्धा आपल्याकडे आता देवराया खुपच कमी शिल्लक राहिल्या आहेत. अजून काही वर्षांनी त्या बघायला मिळतीलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे परतताना मुद्दामहुन देवराईत थांबलो. देवराई आणि त्याला लगत असलेली भैरवनाथ दार ही घाटवाट आवर्जून सोबत्यांना दाखवली आणि परतीची वाट धरली.





       एकंदरीत ही फॅमिली ट्रिप उत्तमच झाली असावी कारण पुढच्या पंधराच दिवसातच गोप्या घाट, शिवथरघळ आणि आंबेनळी घाटाच्या ट्रेकला जाण्याची परवानगी आम्हाला सर्वांनाच विनासायास मिळाली होती. म्हणजे सोबत आलेल्या प्रत्येकाचं घरचं Recharge successfully मारलं गेलं होतं. मात्र त्याची Validity निदान पुढल्या आठदहा ट्रेकपर्यंत तरी कायम राहो याचंच साकडं नंतर सर्वांनी भैरवनाथाला मनोमन घातलं होतं.

समाप्त.


रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

"वरपेडा घाट आणि चांगमोड नाळ"

"वरपेडा घाट आणि चांगमोड नाळ"


'वरंध घाट परीसरातल्या दोन अपरिचित घाटवाटा'


       खरंतर १ मे ची सुट्टी अशीच वाया जाऊ द्यायची नव्हती. ट्रेकींग ग्रूपवर हाक दिली आणि लगेचच नेहमीच्या मंडळीतले चार जण यायला तयार झाले. सगळे नेहमीचेच असल्याने वेगळं काही सांगायची गरजच नव्हती. काय करायचं तर घाटवाटाच. कारण आता 'ट्रेक म्हणजे घाटवाटा' हे आम्हा सर्वांचं समीकरणच होऊन गेलंय. ट्रेकला जायचं म्हणजे घाटवाटांशिवाय दुसरं काही सुचतच नाही.
       आता घाटवाटा ठीक आहेत हो! पण कोणत्या करायच्या? पहिलं तर त्या आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आणि बजेटमधे बसायला हव्यात आणि दुसरं म्हणजे त्या दाखवायला घेऊन जाणारा माणूसही मिळायला हवा. बरं त्यातून त्या जर नवीन कळलेल्या असतील तर मग काय 'सोनेपे सुहागाच'.

       काही दिवसांपूर्वीच वरंध घाटाजवळच्या 'चिकणा आणि कुंभेनळी' अशा दोन घाटवाटा केल्या होत्या. आल्यावर आमच्या 'घाटी' मित्रांना केलेल्या ट्रेकबद्दल सांगितलं तर त्यांच्या म्हणण्यानूसार या घाटवाटेत वाघजाई देवीचं ठाणं असल्यामुळे मी जो कुंभेनळी म्हणतोय तो कुंभेनळी नसून वाघजाई आहे. डोंगरयात्रा पुस्तकातल्या उल्लेखानुसार वाघजाई घाट हा उंबर्डीतून तळीये गावात उतरतो पण आम्ही तर कुंभेनळी गावातून चढून उंबर्डीत आलो होतो. कोकणात असलेल्या कुंभेनळी आणि तळीये या दोन्ही गावात तसं अंतरही बरंच आहे. मग वाघजाई घाट नेमका कोणता? हे गणित काही केल्या सुटत नव्हतं. म्हणून यावेळी या वाघजाईचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आणि त्याच्या सोबत नवीनच समजलेली वारदरा ऊर्फ वाव्हळाची वाट करायची असं ठरवलं होतं पण नशीबात मात्र काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं.
       ट्रेकचं ठरल्यापासून शिरगावच्या गोविंदला म्हणजे आमच्या वाटाड्याला सारखा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन काही केल्या लागत नव्हता. अगदी मेसेज पण टाकून ठेवला होता. त्याचाही काही रिप्लाय आला नाही. मग शेवटी ट्रेकच्या आदल्या रात्री एक वाजता त्याला थेट घरी जाऊनच उठवलं आणि दुसर्‍या दिवशीच्या आमच्या प्लॅनबद्दल सांगितलं. नशीबानं तोही लगेचच तयार झाला. एवढं सगळं करुन मगच गावातल्या दुर्गादेवीच्या मंदीरात मुक्कामाला पोहोचलो.

       सकाळी लवकर उठून आवरलं. वरंध घाटातल्या आणि उंबर्डी गावाच्या हद्दीत असणाऱ्या 'पवार हॉटेल' जवळ गाडी पार्क केली त्यावेळी आजूबाजूची बहूतेक सगळी हॉटेलं हळूहळू उघडत होती. आता इथून कोणती तरी 'वाघजाई' नावाची वाट तळीयेत उतरणारी असायला हवी होती. इथले बहूतेक हॉटेलवाले उंबर्डीचे आहेत त्यामुळे त्यांच्याकडेच वाघजाईबद्दल चौकशी केली. पण त्यांच्या म्हणण्यानूसार उंबर्डीतून या नावाची कोणतीच वाट तळीयेत उतरत नाही किंवा जवळपास वाघजाईचं असं ठाणंही नव्हतं की तिच्या जवळून एखादी वाट तळीयेत उतरत असेल. म्हणजे उंबर्डी ते तळीये अशी कोणताही 'वाघजाई' नावाची घाटवाट नव्हती हे नक्की झालं होतं. तिथे दुसरीच एक घाटवाट होती, तिचं नाव 'वरपेडा' घाट'. अर्थात घाटमाथ्यावरचे आणि कोकणातले लोक एकाच घाटवाटेला दोन वेगवेगळ्या नावाने संबोधतात त्यामुळं या घाटवाटेला कोकणातले लोक 'वाघजाई' म्हणत असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आम्हाला तळीये गावात जायचं असल्यामुळे मग याच वाटेने उतरून गेलो. या वाटेने आठदहा वर्षांपूर्वी मी उतरुन माझेरी गाठली होती. त्या वेळच्या आणि आजच्या वाटेत खुपच फरक पडला होता. आताची वाट पुर्णपणे मोडली होती. सुरवातीपासूनच प्रचंड घसारा होता.



       नुकताच वणवा लागून गेल्यामुळे नुसते हात-पायच नाही तर सगळे कपडे सुद्धा काळेकुट्ट झाले.


       मग जसं जमेल तसं, अगदी वेळप्रसंगी सपशेल खाली बसूनच उतरावं लागत होतं. घसारा असल्यामुळे वाट कमी अंतराची असुनही प्रचंड वेळ लागत होता.


       कोकणात उतरल्यावर तळीयेच्या वाटेवर असताना डाव्या बाजूला सुकून गेलेला 'मोरजोत' धबधबा दिसला. पावसाळ्यात तर हा धबधबा वरंध घाटातून फारच सुरेख दिसतो.


       धबधब्याचा ओढा ओलांडताना अगदी ओढ्यातच 'मावळाई' देवीचं ठाणं लागलं. या वनदेवीला कळकाच्या परड्या वाहतात.


       तसंच पुढं तळीये गावाकडे जाताना डाव्या बाजूला थोडं वर 'चांगमोड' सुळका दिसतो.



       त्याला लागूनच अलिकडे 'चांगमोड नाळ' आहे. अजून थोडं पुढं असलेल्या तळीये गावातून एक वाट याच चांगमोड नाळेला वरच्या बाजूने ओलांडून उंबर्डीच्या दांडवाडीची एक छोटीसी वस्ती असलेल्या कोपीदांडावरच्या घरांपाशी चढून जाते. पुढे तळीयेत जाऊन परत याच नाळेत यायचं असल्यामुळं याच नाळेतून शॉर्टकटने सरळ वर चढून तळीये ते दांडवाडीच्या वाटेला लागायचं ठरवलं.


नाळेतच बसून नाश्ता उरकला.


       थोडं वर चढून गेल्यावर दोन समांतर नाळा सुरु झाल्या. डाव्या बाजूच्या नाळेतूनच पुर्वी बऱ्यापैकी वाहती वाट होती. पुर्वी वाट वाहती असल्याने त्यात कातळटप्पे नसावेत असा अंदाज बांधला होता. तरीही दोन कातळटप्पे लागलेच. पहिला होता ५०-६० फुटांचा सोप्या श्रेणीचा.



       तर एक ३० फुटांचा अवघड श्रेणीचा. आम्ही ट्रेकला सोबत शंभर फुटी सुरक्षा दोर नेहमीच बाळगतो त्यामुळे हे दोन्ही टप्पे अगदी सुरक्षितपणे पार केले.






       वाट नाळेतुन डाव्या बाजूला वळून कोपीदांडावर जाते. नेमकी वाट सापडलीच नाही म्हणून मग सरळ नाळेतुनच चढून थेट घाटमाथ्यावर पोहोचलो. आम्ही जिथं सह्यमाथ्यावर होतो त्याच्या थोडं पश्चिमेकडे कुंभेनळीच्या वाडीतून वाव्हळाची वाट किंवा वारदरा घाट चढून येतो.


       इथून पुर्वेकडे पाहिल्यावर समोरच्या बा़जूला थोडी वर उंबर्डीची दांडवाडी होती. त्याच्या थोडं अलिकडं कोपीदांडावर दांडवाडीचे वाडे होते. सात-आठ वर्षांपूर्वी शेती करण्यासाठी तिथे लोक रहात होते. पण हल्ली कुणीच रहात नाही. उजव्या बाजूला सोंडेखाली कुंभेनळी, कुंभेनळीवाडी तर डाव्या बाजूला तळीये गाव आणि नेमका पाठीमागे तळीयेच्या जननीचा डोंगर.
       घाटमाथ्यावरच्या दाट झाडीत थोडी विश्रांती घेतली. जागोजागी गव्याचे शेण पडलेले दिसत होते. आसपास कुठे पाणी नसल्यामुळं त्यांनी आपला मुक्काम नीरा-देवघर धरण क्षेत्राजवळ हलवला होता असं गोविंदने सांगितल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला होता. कालच दोन गवे धरणात गतप्राण झालेत अशीही माहिती त्याने वर सांगितली.
तासाभरात कोपीदांडावर पोहोचलो. तिथले पडके वाडे पाहून दक्षिण दरीकडे गेलो.


       डाव्या बाजूला खाली कुंभेनळी, उजव्या बाजूला कुंभेनळीवाडी आणि त्याला लागून असलेला वारदरा घाट पाहून परत कोपीदांडावर पोहोचलो. इथून एक वाट थेट पवार हॉटेलवरुन उंबर्डीत जाते. पण आमच्या वाटाड्याला गोविंदला ही वाट माहिती नसल्याने धोपट मार्गाने दांडवाडीच्या वाटेला लागलो. हा थोडा वळसा पडणार होता खरा पण वाट चुकण्याची भीती नव्हती.


वाटेत भेकराने झाडावर शिंगे घासल्याच्या खुणा दिसल्या.


       उंबर्डीच्या दांडवाडीत पोहोचायला तीन वाजले. तिथे असलेल्या गोविंदच्या बहिणीच्या घरी डबे खाल्ले.




थोडा आराम केला आणि पवार हॉटेल गाठले.





       थोडा वेळ हातात असल्यामुळे वरंध घाटाची पायवाट आणि तिच्या खोदलेल्या पायर्‍या, मुळ वाघजाईचं मंदीर, पाळदार घाटवाट, उंबर्डी गाव, नऊटाक्या पाहिल्या. आजुबाजुला शेवत्या घाट, मढेघाट, उपांड्या घाट, कावळ्या किल्ला, माझेरी, पारमाची, रामदास पठार वगैरे ठिकाणं पाहून गाडीपाशी आलो आणि पुण्याला परतलो.








       या ट्रेकमधे नेहमीप्रमाणेच काही नवीन वाटा कळल्यात.

१) उंबर्डीच्या दांडवाडीची काही घरं कोपीदांडावर होती. त्या घरांपासुन एक वाट चांगमोड नाळेतुन तळीये गावात जाते. खरंतर याच वाटेनं आम्हाला दांडवाडीत यायचं होतं पण ही वाट आम्हाला काही सापडली नाही.

२) उंबर्डीतुन पवार हॉटेलच्या जवळुन एक वाट कोपीदांडावरुन तळीयेत जाणार्‍या वाटेला मिळते. ही वाटही एकदा जाऊन पाहून यायची आहे.

३) पवार हॉटेलपासून म्हणजे उंबर्डीच्या फाट्यावरून एक वाट थेट माझेरीत उतरते. हॉटेलवाल्या पवारांनी समजा हात करुनही उंबर्डीच्या स्टॉपवर एसटी थांबली नाही तर या वाटेने ते एसटी पोहोचण्यापूर्वी चालत माझेरी गाठत अशी माहिती खुद्द पवारांनी दिली.

       पाहूया कधी करायला जमतायत या वाटा. आता या वाटा धुंडाळताना अजूनही काही नवीन वाटा सापडतीलच. नाही का?

फोटो सौजन्य -

१) सुजय पुजारी
२) महादेव पाटील
३) शोएब तांबोळी
४) निनाद बारटक्के

समाप्त.