"मावळ म्हणजे काय?"
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात शुन्यातुन स्वराज्य उभं केलं. मराठेशाहीचा पायाच त्यांनी इतका मजबूत घातला होता की ते पूर्णपणे लयास जाण्यासाठी पुढची तब्बल दोनशे वर्षे जावी लागली. अशा स्वराज्याचा पाया घालण्यापासून ते त्याचा विस्तार करण्यापर्यंत पुण्याच्या आसपास असणाऱ्या मावळातल्या देशमुख-देशपांडेंची त्यांना अत्यंत मोलाची साथ लाभली. मोगल सरदार 'शास्ताखान' प्रकरण असो किंवा सिध्दी जौहरच्या वेळचे 'पन्हाळगड ते विशाळगड' असो, काटक असणाऱ्या मावळ्यांची साथ त्यांना कायमच लाभली. अफजलखान प्रकरणात मावळातल्याच कान्होजी जेध्यांनी त्यांच्या सगळ्या वतनावर पाणी सोडल्याचं तर सर्वश्रूतच आहे. अत्यंत काटक, शुर, कर्तबगार आणि विश्वासू मावळे ज्या भागातील असत ते "मावळ" म्हणजे काय? तेथील कर पध्दती, असणारे किल्ले त्याचा हा थोडक्यात लेखाजोखा.
मावळ म्हणजे नेमकं काय हे पाहण्याआधी 'मावळ' या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे पाहणंही मोठं रंजक ठरेल. स. आ. जोगळेकरांच्या सह्याद्री ग्रंथात मावळ प्रांताच्या उत्पत्तीचे अतिशय सुरेख वर्णन दिले आहे. त्या ग्रंथात जोगळेकर म्हणतात...
'मावळ या शब्दाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे लावण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन शिलालेखात मामलाहार असा प्रादेशिक उल्लेख आढळतो. महाबळेश्वराचे जुने नाव मामलेश्वर असे आहे. मनुस्मृतीत मल्ल नावाच्या संकरजन्य जमातीचे नाव आहे. मल्ल किंवा तत्सम शब्द अंतर्भूत असलेली ग्रामनामे विशेषतः नगर, पुणे व सातारा या जिल्ह्यात आढळतात. या साधनांवरून श्री आबा चांदोरकर यांनी सिद्धांत मांडला आहे की मावळ म्हणजे 'मल्लराष्ट्र', किंवा महामल्ले - मामल्ल - मावळ = 'अत्युच्चपर्वतवेष्टीत' प्रदेश. ज्या प्रदेशातील अरण्यात महामल्ल, अस्वले पुष्कळ असतात तो प्रदेश'.
अ) भौगोलिक क्षेत्र
अ- १) डोंगररांगा
सह्याद्रीची मुख्य रांग तापी नदीच्या खोऱ्यापासून सुरू होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी नदीपर्यंत 'दक्षिणोत्तर' पसरलेली आहे. तिला 'पुर्व-पश्चिम' काही उपरांगा जोडलेल्या आहेत. अशा या बहूतांशी रांगांना नावे आहेत. ज्यावर आपला सिंहगड आहे अशी भुलेश्वर रांग, सर्वात मोठी उपरांग असणारी महादेव रांग, बाळेश्वर, शैलबारी-डौलबारी, अजिंठा-सातमाळ इत्यादी. या पुर्व-पश्चिम उपरांगांना कोकणात माथेरान आणि महिपतगड रांग तर घाटमाथ्यावर दातेगड रांग आणि भाडळी-कुंडल ही महादेव उपरांगेची उपउपरांग या फक्त चार रांगांचे अपवाद सांगता येतील ज्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर म्हणजे दक्षिणोत्तर धावतात. यापैकी सह्याद्रीची मुख्य रांग आणि दातेगड रांगेदरम्यान कोयना धरणाचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र येतं.
अजून सोपं करून सांगायचं झालं तर आपल्या अभ्यासाच्या वहीचं पान असतं हे त्याप्रमाणेच आहे. समासाची उभी रेघ म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग, त्याच्या उजव्या बाजूच्या रेघा म्हणजे ज्यावर आपण लिहितो त्या उपरांगा आणि समासाच्या डाव्या बाजूच्या रेघा म्हणजे कोकणात उतरलेले दांड किंवा नाळा आहेत ज्या वरून अनेक घाटवाटा कोकणात उतरत जातात. झालं कि नाही सोप्पं?
अ - २) नद्यांची खोरी
पुण्याहून नाशिककडे जाताना आळेफाटा लागतो. या आळेफाट्यावरून डावीकडे वळलं की माळशेज घाटातुन कल्याणला जाता येतं. माळशेज घाटाच्या थोडं अलिकडं उजव्या बाजूला पिंपळगावजोगे धरण आहे, जे पुष्पावती नदीवर आहे. त्याच्या मागच्या बाजूला जी रांग दिसते तिला हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग म्हणतात. या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या उत्तरेकडील म्हणजे साधारणपणे नाशिक भागातील सर्व नद्या गोदावरीला मिळतात तर...
...तर पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना शिरवळच्या पुढे खंबाटकी घाट लागतो. हा घाट महादेव रांगेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी ही रांग रायरेश्वरापासून सुरू होऊन शिखरशिंगणापुर जवळ संपते. या रांगेच्या अलिकडच्या म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट आणि महादेव रांगेदरम्यानच्या सगळ्या नद्या नद्या भीमेस मिळतात...
...आणि महादेव रांगेच्या दक्षिणेकडे असणाऱ्या म्हणजे कोल्हापूर जवळच्या सर्व नद्या कृष्णेला.
महाराष्ट्रात गोदावरी, भीमा आणि कृष्णा या तीन नद्यांची खोरी आहेत. परंतु भीमा नदी पुढे जाऊन कृष्णेलाच मिळत असल्याने मुख्य नद्या दोनच आहेत, एक त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी आणि दुसरी महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा. कारण या दोनच नद्या अशा आहेत कि त्या उगम ज्या नावाने पावतात त्याच नावाने समुद्राला जाऊन मिळतात.
ब) ऐन मावळात
सर्वसाधारणपणे भीमेच्या खोऱ्यात असणारा म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या दक्षिणेकडील आणि महादेव रांगेच्या उत्तरेकडील भाग म्हणजे मावळ. थोडक्यात सांगायचं झालं तर भीमेच्या खोऱ्यात येणाऱ्या भागाला मावळ म्हणतात.
मावळ हे पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन पश्चिमेकडील काही भागात पसरलेलं आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणारा प्रदेश हा मावळात मोडतो. ज्या दोन उपरांगांदरम्यान असणाऱ्या नदीच्या क्षेत्रात नाचणी, वरई, भात इत्यादी पावसाळी पिकं पिकवली जातात अशा प्रदेशाला 'मावळ', 'खोरं' किंवा 'नेरं' अशा संज्ञा आहेत.
क) मावळांची नावं
अशा मावळांना तिथून वाहणाऱ्या नदीच्या किंवा त्या भागात असणाऱ्या मुख्य गावाच्या नावाला साधर्म्य सांगणारी नावं आहेत. किंवा असं म्हणा हवंतर कि मावळांची नावं तिथं असलेल्या नदीच्या वा गावाच्या नावावरूनच आली आहेत. जसं पवनेचं 'पवन मावळ', पौड गाव असणारं 'पौड खोरं' तर भीमेचं भीमनेर, भामाचं भामनेर इत्यादी.
ड) प्रशासकीय व्यवस्था
सध्याच्या काळात जिल्ह्याचा मुख्य जसा जिल्हाधिकारी असतो तसा त्याकाळी मावळांचा मुख्याधिकारी असे 'देशमुख'. जणु त्या मावळाचा राजाच. देशमुख त्याच्या भागातला सरकारने ठरवून दिलेला शेतसारा गोळा करीत असे आणि त्यातील काही हिस्सा त्या भागाच्या संरक्षण व विकास यासाठी स्वतःकडे ठेवून, बाकी सरकारजमा करत असे. या कामासाठी देशमुखाकडे प्रशासकीय लोक असत. देशपांडे, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रशासकीय पदे त्या त्या कामासाठी नेमलेली असत.(कालांतराने हीच पदे आडनावं म्हणून रूढ झाली) चांगलं काम करणाऱ्या देशमुख घराण्याला राजाकडून किताब दिला जाई. जसं पासलकरांना 'यशवंतराव', जेधेंना 'सर्जेराव'.
इ) सैन्य आणि करवसुली
मावळाच्या आजूबाजूला असणाऱ्या डोंगररांगांवर किल्ले असत आणि ते या देशमुखांच्या ताब्यात असत. त्याच्या संरक्षणासाठी ते स्वतःचे सैन्य वा पागा (घोडदळ) बाळगत असत. त्यामुळं त्यांचा तिथं राहण्याऱ्या लोकांवर दरारा असे. जे शेतकरी शेतसारा देत नसत त्यांच्याकडून तो वसुल करावा लागे आणि अशी कामे बहुतांशी 'देशपांडे' मंडळी करत असत. 'देशपांडे' लढवय्ये असल्याची दोन उदाहरणे आपल्या सर्वांना माहिती आहेतच. बांदलांकडील बाजीप्रभू आणि मोऱ्यांकडचे मुरारबाजी.
फ) एकुण मावळं
भीमेच्या खोऱ्यात पुणे हे साधारण मध्यात आहे त्यामुळं पुणे हे मुख्य मावळ (कर्यात* मावळ) असं समजलं तर त्याच्या पश्चिमेकडे म्हणजे मावळतीकडचा भाग म्हणजे मावळ असं सर्वसाधारणपणे समजलं जातं परंतु मावळांची ठिकाणं जाणून घेतल्यानंतर हा सिद्धांत चुकीचा ठरतो. एकूणच काय तर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणाऱ्या प्रदेश म्हणजे मावळच पण त्याला म्हणताना बाकी 'मावळ', 'खोरं' किंवा 'नेरं' असं म्हटलं जातं. इंद्रायणी नदी ते नीरा नदीदरम्यान खोऱ्यांच्या आणि मावळांच्या नावात सरमिसळ आहे पण पुण्याहून जुन्नरकडे जाताना फक्त 'नेरं'च आहेत. भामनेर, भीमनेर, घोडनेर, मिन्नेर, कुकडनेर, जुन्नेर?, संगमनेर?, सिन्नेर? अंमळनेर?
'सह्याद्री'कार स. आ. जोगळेकर म्हणतात नेर म्हणजे नहर. पाण्याच्या प्रवाहाला नहर म्हणतात. कुकडी नदीकाठी असलेलं जुन्नर हे अगदी प्राचीन शहर म्हणून त्याला जुने-नेर = जुन्नेर संज्ञा असावी. संगमनेरमधून प्रवरा आणि सिन्नेरमधून सरस्वती नद्या वाहतात ज्या पुढे गोदावरीला मिळतात तर अंमळनेरमधून वाहणारी बोरी नदी पुढे जाऊन तापीला मिळते. त्यामुळं एखाद्या 'नहर' शेजारी असणाऱ्या मोठ्या गावापुढे बहुधा 'नेर' लावलं जात असावं. अकोलनेर, पारनेर, जामनेर पिंपळनेर ही सुध्दा काही गावाच्या नावात 'नेर' असलेली उदाहरणं सांगता येतील.
पुण्याखालची बारा मावळं आणि जुन्नर (जुने-नेर) खालील बारा, अशी चोवीस मावळं आहेत असं तुलशीदास शाहीराच्या पोवाड्यात आहे. पण असं वाटतं की ती एकूण बावीस आणि थोडं वेगळ्या भागात असलेलं एक शिवतर अशी एकूण तेवीस आहेत आणि ती पुढे दिलेली आहेत.
प्रथमतः खोऱ्याचे/मावळाचे/नेऱ्याचे नाव नंतर तिथे वाहणारी नदी, त्यात येणारे मुख्य गाव, असणारा किल्ला, देवस्थान, तेथील देशमुख आणि शेवटी त्याचा किताब या क्रमाने ती वाचावीत.
१) मढनेर - पुष्पावती नदी/ मांडवी नदी - मढ/ ओतुर - सिंदोळा - हटकेश्वर.
२) कुकडनेर - कुकडी नदी - घाटघर/ जुन्नर - शिवनेरी/ चावंड - कुकडेश्वर.
३) मिन्नेर - मिना नदी - नारायणगाव - नारायणगड.
४) घोडनेर - घोड नदी - घोडेगाव/ मंचर - भीमाशंकर.
५) भीमनेर - भीमा नदी - राजगुरूनगर - भोरगिरी - भीमाशंकर.
६) भामनेर - भामा नदी - चाकण - संग्रामदुर्ग.
७) अंदरमाळ (आंद्रा) - आंद्रा - सावळे - वडेश्वर - हांडे देशमुख.
८) नाणे मावळ - इंद्रायणी - नाणे/ लोणावळे - लोहगड - कोंडेश्वर/ कुंडेश्वर/ कुंडलेश्वर - गरूड देशमुख.
९) पवन मावळ - पवना - पवनाळे/ चिंचवड - तुंग-तिकोना - वाघेश्वर
१०) कोरबारसे - आंबवडे.
११) पौड खोरे - मुळा नदी - मुळशी - कैलासगड/ कोरीगड - बलकवडे देशमुख / ढमाले देशमुख (राऊतराव).
१२) मुठे खोरे - मुठा नदी - मुठे - म्हसोबा?(खारवडे) - मारणे देशमुख (गंभीरराव).
१३) मोसे खोरे - मोसी नदी - मोसे - कुर्डुगड - पासलकर देशमुख (यशवंतराव).
१४) आंबी खोरे - आंबी नदी - पानशेत.
१५) कानंद मावळ - कानंदी नदी - वेल्हे - तोरणा - मरळ देशमुख (झुंजारराव).
१६) गुंजन मावळ - गुंजवणी नदी - गुंजवणे - राजगड - अमृतेश्वर - शिळीमकर देशमुख (हैबतराव).
१७) खेडेबारे खोरे - शिवगंगा नदी - खेड शिवापुर - बनेश्वर - कोंडे देशमुख (नाईक).
१८) वेळवंड खोरे - वेळवंडी नदी - भाटगर - कांब्रेश्वर - ढोर देशमुख (अढळराव).
१९) हिरडस मावळ - नीरा नदी - हिरडोशी - कासलोडगड / रोहीडा - बांदल देशमुख (नाईक).
२०) भोर खोरे - नीरा नदी - भोर - रायरेश्वर - जेधे देशमुख (सर्जेराव) / खोपडे देशमुख.
२१) कर्यात मावळ - मुठा नदी - पुणे - सिंहगड - पायगुडे देशमुख (रवीराव) / शितोळे देशमुख.
२२) घोटण खोरे - घारे देशमुख.
२३) शिवतर खोरे - कोयना नदी - जावळी - प्रतापगड - मोरे देशमुख (चंद्रराव).
* - कर्यात - (स्त्री) [अ. कर्यत + गाव]
तालूका, दहा-बारा गावांचा पेटा/समुह
मुळ अरबी भाषेत असलेल्या 'कर्यत' शब्दास गाव जोडून फार्सी भाषेत कर्यात हा शब्द आला आहे. कर्यात म्हणजे तालूका किंवा दहा-बारा गावांचा पेटा/ समुह.
खरंतर मावळातल्या बहुतांशी लोकांचं मुळचं कुलदैवत हे महादेवच. त्यामुळं प्रत्येक मावळांत एखादं तरी पुरातन शिवालय नक्कीच असतं. मोहरीचा अमृतेश्वर, नसरापूरचा बनेश्वर अशी काही उदाहरणं सहजपणे सांगता येतील. त्यातच मावळचा भाग हा धरणं बांधण्यासाठी नैसर्गिकरित्या अतिशय परिपूर्ण असल्यामुळं सगळ्याच मावळांत हल्ली धरणं बांधली गेली आहेत. बऱ्याच मावळांतली नदीकाठी असलेली शिवालयं ही धरणं बांधल्यामुळं त्यांच्या पाणलोट क्षेत्रात कायमच बुडलेली असतात. उन्हाळ्यात ज्यावेळी धरणातली पाणी पातळी कमी होते त्यावेळी अशा मंदीरांचे अवशेष दिसू लागतात. एवढंच नाही तर कायम पाण्यात असल्यामुळं काही मंदिरं तर पूर्णपणे नामशेष झाली आहेत. सदर लेखात जेवढ्या शिवालयांची नावं समजली तेवढीच लिहिली आहेत. बऱ्याच ठिकाणची नावं अजूनही सापडलेली नाहीत. वाचक/अभ्यासक या माहितीत नक्कीच भर घालू शकतात.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेपासून एकूणच प्रशासकीय व्यवस्थेत हळूहळू पण आमुलाग्र बदल केले. वर दिलेल्या पैकी 'प्रशासकीय व्यवस्था' व 'सैन्य आणि करवसुली'च्या बहुतेक पध्दती शिवपूर्वकाळातील आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत सैन्यव्यवस्था आणि मुलकी व्यवस्था असे दोन भाग पडतात. परंपरागत सरंजामशाही संपवून सैन्य व्यवस्था राजकेंद्रीत तर मुलकी व्यवस्था लोककेंद्रीत करण्याचं श्रेय शिवाजीराजांना जातं. महसुलाच्या मोजणीचं काम सर्वप्रथम दादाजी कोंडदेव, नंतर मोरोपंत पिंगळे आणि शेवटी अनाजी दत्तो यांनी करून त्यात एकसुत्रीपणा आणण्याचा प्रयत्न केला. लेखाचा विषय 'मावळ म्हणजे काय?' असल्याने प्रशासकीय व्यवस्थेबद्दल पुन्हा कधीतरी.
माझ्या या लेखात दिलेली माहिती परिपूर्ण नक्कीच नाही. खरंतर वर नमुद केलेल्या प्रत्येक मुद्यावर एकएक लेख लिहिता येईल. केवळ विस्तारभयावह येथे देण्याचे टाळले आहे. याशिवाय हे देखील सांगू इच्छितो कि या प्रस्तुत लेखात असणारी माहिती शंभर टक्के खरी आहे असंही मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या जुजबी ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा राहून गेल्या असण्याची नक्कीच शक्यता आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून आणि जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकून, माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे.
शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.
सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ||
संदर्भ -
१) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
२) सह्याद्रीतील रत्नभांडार - प्रमोद मांडे
३) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन
३) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन
फोटो स्त्रोत -
१) गुगल
२) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
समाप्त.