रविवार, २५ जुलै, २०२१

" एक अपरिचित डोंगरयात्रा "

 " एक अपरिचित डोंगरयात्रा "



"कात्रज ते पुरंदर म्हणजेच K2P"

       काही दिवसांपुर्वी मी आणि माझा ट्रेकींगमधला नेहमीचा जोडीदार रघु कात्रज ते भुलेश्वर असा ट्रेक करीत असताना किल्ले पुरंदर आणि वज्रगड उर्फ रुद्रमाळ आम्हांला दुरूनच खुणावत होते. क्षणभर मुरारबाजींच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी आलं. असं त्या पुरंदरात काय होतं कि त्याच्यावरून सातशे मावळ्यांनी आपला जीव क्षणार्धात ओवाळुन टाकला होता. तेव्हाच पुढचा ट्रेक 'कात्रज ते पुरंदर' करायचा अशी खुणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवली होती. पुर्वी हा ट्रेक कोणी केल्याचं ऐकिवात किंवा वाचनातही आलं नव्हतं. तसंच आमच्या संपर्कात असणाऱ्या अनेक ट्रेकर्सपैकी तो कुणीही केला नसल्यामुळं रस्ता शोधण्यापासुन ते ट्रेकला किती वेळ लागेल वगैरे सर्व तयारी करायची होती. आत्तापर्यंत सह्याद्रीतले असे भरपूर आडवाटांचे ट्रेक केल्यामुळं हा ट्रेक सुध्दा यशस्वीपणे पुर्ण करण्याबद्दल आम्हांला पूर्ण आत्मविश्वास होता.

       आमची नेहमीची सकाळची सर्व कामं आटोपून मी, रघु आणि माझी भाची शिवानीला कात्रज घाटापासुन ट्रेक सुरू करायला सकाळचे दहा वाजले. खरंतर ट्रेकींगच्या नियमात हे बसणारं नव्हतं. तसा आमच्या हातात वेळ खूपच कमी होता म्हणून आम्ही कात्रज घाटातल्या वाघजाई देवीला नमस्कार करून ट्रेक चांगला होण्यासाठी साकडं घातलं.

       पुर्वीचा कात्रज घाट-रस्ता वाघजाई मंदिराजवळून जात होता. आजही त्या रस्त्याच्या खुणा काळाशी झुंज देत आपलं अस्तित्व कसंबसं टिकवून आहेत. आज हा रस्ता एक्सप्रेस हायवेच्या युगात अनेकांच्या विस्मृतीत गेला आहे.

       सुरूवातीलाच डोंगरवाटेतल्या मोबाईल टॉवर वरच्या रखवालदाराशी गप्पा मारून पुढं निघालो. कात्रज घाटातल्या लक्ष्मी शिखराला उजव्या बाजूने वळसा घालून डोंगराच्या वाट-नाक्यावर पोहोचायला जवळजवळ एक तास गेला.

       या वाट-नाक्यावरच्या डाव्या बाजूला जाणारी वाट ही बोपदेव घाट, कानिफनाथ, दिवे घाट, मल्हारगड, ढवळेश्वर मार्गे किल्ले दौलतमंगळ उर्फ भुलेश्वरला जाते तर उजवी वाट पुरंदरकडे जाते.




       रस्त्यात स्फटिकासारख्या पाण्याचा एक ओढा होता. त्या ओढ्याच्या गारेगार, प्रदुषण विरहीत पाण्यानं शरीरात नवा जोम संचारला.


       पुढं दरेगावला जाताना टेकडीवर शंकराचं एक मंदिर लागलं. जवळजवळ शंभर लोकांना मुक्काम करता येईल एवढया प्रशस्त सभामंडपाचं बांधकाम चालू होतं. मंदिराचा पुजारी मंदिराच्या शेजारीच रहात असल्यानं त्याला दरेगावचा रस्ता विचारून पुढे निघालो.



       दरेगावला कऱ्हा नदीचा उगम आणि कऱ्हामाता मंदिर आहे. मंदिराच्या जुन्या दगडी बांधकामात सुंदर गोमुख आहे. या छोटेखानी मंदिराच्या परिसरात आल्यावर आचार्य अत्रे लिखित 'कऱ्हेचे पाणी' या त्यांच्या आत्मचरित्राची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.





       दरेगाव सोडल्यावर लगेचच एक छोटासा बंधारा घातलेलं तळं लागलं. गावातले दोघं-तिघं जण करमणूक म्हणून त्या तळ्यात गळ टाकून मासेमारी करीत होते. तळं सोडल्यावर पुढं सासवडहून 'मरिआई' घाटाला जाणारा आडवा रस्ता लागला. दुपारचा एक वाजला होता आणि कडाडून भुकही लागली होती. दरेगावच्या पुढे थापेवाडीच्या रस्त्याच्या कडेला बसुन बरोबर आणलेलं थोडेसं खाऊन घेतलं. पोटोबा शांत झाल्यानं थकलेल्या शरीरात लगेचच नवचैतन्य संचारलं.

       थापेवाडी पार करून दुरकरवाडीत पोहोचलो तोपर्यंत साधारण दिड वाजला होता. रस्त्यात वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं लक्ष वेधून घेत होती. छोटेखानी झुडूप असलेली पावसाळ्यात येणारी 'भारंग' सुध्दा बहरली होती. याच्या जांभळ्या फुलांची किंवा कोवळ्या पानांची भाजी करून खातात.





       दुरकरवाडीतच पण जरासं आडबाजुला 'मानाई' देवीचं छोटेखानी सुंदर मंदिर लागलं. मंदिराच्या परिसरात अनेक छोटी-मोठी झाडे होती. त्यापैकी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या या मंदिराला गोलाकार वळसा घालून एक ओढा वाहतोय. त्या खळाळत वाहणाऱ्या ओढ्यावरच्या पुलावरून या मंदिरात जाता येतं. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. शेजारीच हातपंप असल्यानं क्षणभर विश्रांतीसाठी, न्याहारी आणि भोजनासाठी तर हा परिसर अतिशय उत्तम आहे.





       दुरकरवाडीतुन बाहेर पडल्यावर सोमुर्डी गावाच्या वाटेवर उजवीकडे जुन्नर जवळच्या नाणेघाटासारखी खिंड दिसली. आपोआपच आमचे पाय खिंडीकडे वळले. या खिंडीला स्थानिक लोक दुरकरवाडीची किंवा सप्रेवाडीची खिंड म्हणतात. खिंडीच्या उत्तरेस थोडं खालील बाजूला असलेल्या गावातून पुर्वी राजगड-तोरण्याकडुन येणारा मार्ग असावा असं सहजच वाटलं पण खात्री करून घेण्यासाठी आसपास कोणीच नसल्यामुळं आणि दुपारचे सव्वादोन वाजल्यानं वेळ न दवडता पुढं निघालो.

       दुरकरवाडीच्या पुढच्या सोमुर्डी गावात पोहोचायच्या अलीकडे एक शेततळं लागलं. तळ्याच्या काठावर एका मोठया दगडापाशी जरा विसावलो त्यावेळी दुपारचे चार वाजले होते.


       समोरच 'चंद्र पर्वत' दिसत होता. सोमुर्डी गावाच्या हद्दीत असलेल्या या चंद्र पर्वतावर आणि गावात अशा दोन्ही ठिकाणी भैरवाचं मंदिर आहे. गावातलं मंदिर चांगलं प्रशस्त आहे. चंद्र पर्वतावरून एक धार खाली उतरली आहे. त्या धारेवरची खिंड ओलांडून पुरपोखर गावी पोहोचलो.


       सोमुर्डीपासुन पुरपोखर साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जसा सोमुर्डीला चंद्र पर्वत आहे तसा पुरपोखरला 'सुर्य पर्वत' आहे. या सुर्य पर्वतावरच कानिफनाथांचं छोटेसं मंदिर आहे.

       पुरपोखर गावाच्या जवळ एक वृद्ध शेतकरी वाळत घातलेल्या भुईमुगाच्या शेंगा उचलून पोती भरत होता. बोलता बोलता तो म्हणाला गाडीरस्ता पुरंदरला येत असताना तुम्ही चालत का पुरंदरला आलात? तो माळकरी दिसल्यानं मी त्याला म्हटलं तुम्हांला पंढरपूरला वारीला जाऊन जे मिळतं तेच आम्हांला असं चालत येऊन मिळतं. विठ्ठल जसं तुमचं दैवत तसंच शिवराय हे आमचं दैवत आणि गड किल्ले हीच आमची तिर्थस्थळे. दोघेही वारकरीच. न रहावून दोघेही एकमेकांच्या पाया पडलो. असो, त्याच्याशी गप्पा मारता मारता शेंगांचा मनमुराद आस्वाद घेतला.

       पुरपोखरनंतर किल्ले पुरंदरच्या पायथ्याच्या नारायणपुर गावात पंधरा मिनीटातच पोहोचलो. गावातल्या गजबटात जास्त वेळ न घालवता पायथ्याशी असणाऱ्या नारायणपेठ मार्गे तडक पुरंदरचा बिनी दरवाजा गाठला. समोरच्या मुरारबाजींच्या पुतळ्यासमोर उभं राहिल्यावर क्षणार्धात पुरंदरच्या युद्धाचा प्रसंग डोळ्यांपुढं जसाच्या तसा उभा राहिला. हाकेच्या अंतरावरचा वज्रगड हातातून गेला होता. पुरंदरची पुरंदरेश्वराचं मंदिर, बिनी दरवाजा असलेली माची आणि भैरवखिंडही ताब्यातून गेली होती. फक्त बालेकिल्लाच काय तो शिल्लक राहिला होता. मुरारपंत पडले होते आणि तरीही गडावरच्या मावळ्यांनी महाराजांना निरोप धाडला की 'एक मुरारबाजी पडले म्हणून काय झालं? सातशे मुरारबाजी अजूनही जिवंत आहेत. महाराज, काळजी नसावी.' या मावळ्यांना प्रसंगी स्वतःच्या जीवाची होळी करण्यासाठी कुठून प्रेरणा मिळत असेल? असा विचार फक्त मनात जरी आला तरी अचंबित व्हायला होतं. शिवकाळात घडलेला प्रत्येक युद्धप्रसंग कल्पनातीत धाडसामुळं मावळ्यांनी इतिहासात अक्षरशः अजरामर करून टाकला आहे. धन्य ते मावळे आणि धन्य त्यांची ती स्वराज्यनिष्ठा. 

       रघूने हाक मारली आणि एकदम भानावर आलो. भूतकाळ कितीही गौरवशाली असला तरी वर्तमानात आता समोर वाढून ठेवलेल्या प्रसंगांना सामोरं जायलाच हवं होतं. पायथ्याच्या नारायणपूरातून पुण्याला जाणारी शेवटची एसटी चुकवून चालणार नव्हतं त्यामुळं गडावरच्या पुरंदरेश्वराला दंडवत घालून जड पावलानंच ट्रेकची यशस्वी सांगता केली ती मागे सोडलेल्या दुरकरवाडीतल्या खिंडीचा ट्रेक करण्याचा संकल्प सोडूनच...





🚩 ट्रेकची तारीख - २८ जुलै २०११.

🚩 फोटो - गुगल, दिलीप वाटवे.

🚩 ट्रेकभीडू -

१) दिलीप वाटवे 

२) रघूराज एरंडे

३) शिवानी तापस

लेखनसीमा.






शनिवार, १७ जुलै, २०२१

"भुलेश्वर रांग"

 "भुलेश्वर रांग"

       आपण प्रत्येकजण एका पत्त्यावर रहात असतो, जो आपण बऱ्याच जणांना आणि बरेचदा सांगतही असतो. बरोबर ना? मग जर आपल्यासारखाच आपल्या सिंहगडाला पण त्याचा 'भौगोलिक' पत्ता सांगायचा असेल तर तो कसा सांगेल बरं?

तर तो बहुधा असा सांगेल...

       'महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाच्या म्हणजेच सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे फुटलेल्या भुलेश्वर रांगेवर विंझरजवळ अजून एक फाटा फुटला आहे. या फुटलेल्या आणखी एका उपफाट्यावर मी 'सिंहगड' मुक्कामाला असतो.'

       आम्ही पुणे व्हेंचरर्सच्या बेसिक अॕडव्हेंचर कोर्सला डोंगररांगा, नद्यांची खोरी यांची माहिती मुलांना आवर्जून सांगतो. कारण एकच ते म्हणजे मुलांच्या भटकंतीची सुरूवातच 'डोळस भटकंती'तून व्हावी. प्रत्यक्षात मुलांना सांगताना वेळेअभावी ते थोडक्यात सांगितलं जातं पण ज्यांना सखोल माहिती हवी आहे त्यांच्यासाठी हे मुद्दाम लिहिलंय. बघा आवडतंय का? तर मग आपला मूळ मुद्दा...

'भुलेश्वर रांग नक्की कशी आहे?'

       तर ही भुलेश्वर रांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेल्या खानुच्या डिग्यापासून सुरू होते आणि कादवेखिंड, पाबेखिंड करत शेवटी नसरापुरला संपते. आपण सिंहगड-राजगड ट्रेक करताना कल्याण दरवाज्याच्या समोरच्या टोकावरून विंझरला उतरतो. त्या टोकापासून भुलेश्वर रांगेला आणखीन एक फाटा फुटलाय जो सिंहगड, कात्रज, बोपदेव घाट, कानिफनाथ, दिवेघाट, मल्हारगड, ढवळेश्वर करत शेवटी भुलेश्वरला संपतो. पण या फाट्यालाही कात्रज घाटापुढच्या लक्ष्मी शिखराजवळून आणखीन एक उपफाटा फुटलाय जो चंद्र-सुर्यप्रभात डोंगर, पुरंदर, वज्रगड, हरेश्वर, कडेपठार करत शेवटी जेजुरीला संपतो.


       भुलेश्वर रांग जिथून सुरू होते तिथे सुरवातीला ती कानंदी आणि आंबी नद्यांची खोरी विभागते. कानंदी खोऱ्यात घिसर, वेल्हा वगैरे गावं आहेत तर आंबीच्या खोऱ्यात कशेडी, माणगाव, टेकपवळे, घोळ वगैरे गावं आहेत. कानंदीवर चापेट धरण आहे तर आंबीवर पानशेत. पुढे कानंदीला गुंजवणी मिळते आणि पुढे कानंदी कासुर्डीजवळ नीरेला. पानशेतची आंबी पुढे वरसगाव धरणाच्या मोसीला मिळते आणि या दोघींचं पुढे टेमघरमधून आलेल्या मुठेबरोबर सूत जुळल्यावर तिघी गुण्यागोविंदाने खडकवासल्यात येतात आणि पुणेकरांची तहान भागवतात.

       सिंहगड-राजगड ट्रेक करताना सिंहगडाच्या कल्याण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर आपण एका धारेनेच विंझरच्या उंच डोंगरापाशी जातो आणि खाली धारेवरून उतरून धनगरवाड्यात पोहोचतो. ही जी विंझर टोकापर्यंतची धार आहे तिच्या दोन्ही बाजूलाही दोन नद्यांची खोरी आहेत. उजवीकडे मुठा तर डावीकडे शिवगंगा. सिंहगडाच्या कल्याण दरवाज्याच्या पायथ्याशी असलेली कल्याण, कोंढणपुर, रांझे, खेडशिवापुर ही सगळी गावं शिवगंगेच्या खेडेबारे खोऱ्यात आहेत. एवढंच नाही तर 'खेडेबारे' नावाचं गावही या खोऱ्यात आहे. खरंतर इथं मावळातल्या खोऱ्यांची, मावळांची बरीच नावं आली आहेत त्यामुळं लेखाच्या शेवटी दिलेल्या धाग्यावरून 'मावळ म्हणजे काय?' हे वाचणंही भूगोल समजण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

       एकूण भुलेश्वर रांगेपैकी खानुच्या डिग्यापासून ते नसरापूर आणि इकडे लक्ष्मी शिखरापर्यंतची भुलेश्वर डोंगररांग धारेच्या स्वरूपाची आहे पण नंतर मात्र ती पठारी स्वरूपाची होते त्यामुळे लक्ष्मी शिखरापर्यंत या रांगेला ओलांडणारे रस्ते/वाटा खिंड प्रकारच्या आहेत. थोडक्यात घाटवाट चढून दुसऱ्या बाजूला लगेचच उतरते पण लक्ष्मी शिखरानंतरच्या रांगेवर मात्र घाटवाटा फक्त चढून येतात. एकूण सांप्रत घाटवाटांपैकी काही घाटवाटा अर्वाचीन आहेत तर काही प्राचीन आहेत. काही घाटवाटांवर डांबरी रस्ते आहेत तर काही ठिकाणी अजूनही कच्चे रस्ते आहेत तर काही वाटा अजूनही फक्त पाऊलवाटाच आहेत.

       पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या या रांगेवर पहिला रस्ता आहे तो म्हणजे माणगावपासून डिगेवस्ती/चांदर. नंतरच्या कादवेखिंड आणि पाबेखिंड या घाटवाटा तर पुणेकरांमधे प्रसिध्दच आहेत. नसरापूरकडे उतरणाऱ्या फाट्यावर निगडे घाट आणि कुसगावखिंड हे दोन अतिशय छोटे घाट आहेत, जे खेडेबारे खोऱ्यातून गुंजन मावळात उतरतात. इकडच्या कात्रज घाटाचा शिंदेवाडी बोगदा अगदी नवीन तर जुना रस्ता प्राचीन. या प्राचीन कात्रज घाटानंतरच्या घाटवाटा फक्त चढून येणाऱ्या आहेत. यात नारायणपूर घाट, दुरकरवाडी घाट ऊर्फ गराडखिंड, मरिआई घाट, बोपदेव घाट, होळकरवाडी घाट, दिवेघाट (जुना), दिवेघाट (नवा), शिंदवणे घाट, ताम्हणवाडी घाट आणि शेवटचा भुलेश्वर घाट सांगता येईल. या सर्व घाटांपैकी दुरकरवाडी घाट, जुना दिवेघाट आणि ताम्हणवाडी या घाटवाटा शिवपूर्व काळापासून अस्तित्वात असाव्यात. यातल्या दिवेघाटात आजही कात्रज घाटासारख्या पाण्याच्या खोदीव टाक्या पहायला मिळतात.


       वर उल्लेखलेला दुरकरवाडी घाट ऊर्फ गराडखिंड तर ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक पण कशी? तर अशी...

       "शाहिस्तेखानाला पुण्याला आला त्यावेळी त्याला मराठ्यांची काळजी करायची गरज नव्हती कारण खुद्द महाराज याच काळात सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. पण त्याला मराठ्यांच्या गनिमीकाव्याची चुणूक समजलीच. तो शिरवळहून गराडखिंडीने सासवडकडे येत असताना मराठ्यांच्या म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या तुकडीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला. गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. मराठ्यांनी या एवढ्या कमी अंतरामध्येही खानाला हैराण करून सोडले. ही घटना साधारण एप्रिल १६६० च्या शेवटचा आठवड्यात घडली."

       या गराडखिंडीतून थोडं पुढं आल्यावर 'कोडीत' नावाचं गाव लागतं. 'मराठी सैन्यानं मोघलांचं सैन्य या ठिकाणी कोंडीत पकडून त्यांची दाणादाण उडवली होती म्हणून त्या गावाचं नंतर कोडीत असं नामकरण झालं' अशी या गावाबद्दल त्या भागात आख्यायिका ऐकायला मिळते. मुळातच ही गराडखिंडीची घाटवाट खुपच सुंदर आहे आणि पावसाळ्यानंतर तर या परिसराचं सौंदर्य अजूनच खुलतं. या वाटेने मोटारसायकल वरून आजही सहज जाता येतं. चेलाडीपासून तर अगदी हाकेच्या अंतरावर ही घाटवाट आहे. घाट चढून गेल्यावर वरच्या बाजूला दुरकरवाडी हे छोटंसं खेडेगाव आहे. घाटमाथ्यावर एक छोटीशी खिंड आहे. स्थानिक लोक तिला दुरकरवाडीची किंवा सप्रेवाडीची खिंड म्हणतात. हा शिवकाळातला बहुधा पुरंदर ते राजगड असा मार्ग असावा. खरं काय ते जाणून घेण्यासाठी या वाटेचा मुद्दाम एकदा अभ्यास दौरा करायला हवा.

       खानुचा डिग्याचा भाग हा मुख्य रांगेवर असल्यामुळं प्रचंड पाऊस पडणारा तर जेजुरी किंवा भुलेश्वर भाग पर्जन्य छायेचा प्रदेशात मोडतो. साहजिकच या एकाच रांगेवर पश्चिमेकडून पूर्वेकडे जैवविविधतेत प्रचंड बदल होत गेलेला जाणवतो.

       या रांगेवर असलेली कात्रज ते सिंहगड म्हणजे K2S डोंगरयात्रेची पुणेकर मंडळी चक्क पारायणं करतात पण 'खानुचा डिगा ते पाबेखिंड, पाबेखिंड ते नसरापुर', 'विंझर धनगरवाडा/सिंहगड ते कात्रज', 'कात्रज ते दिवेघाट', 'दिवेघाट ते शिंदवणे घाट', 'शिंदवणे घाट ते भुलेश्वर', 'कात्रज ते पुरंदर' आणि 'पुरंदर ते जेजुरी' अशी वेगवेगळ्या एकदिवशीय डोंगरयात्रा असलेली भुलेश्वर रांग टप्प्याटप्प्याने का होईना पण भटकायला हवी.

       भुलेश्वर रांगेवरचा 'सिंहगड' हा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला. जो किल्ला स्वतःच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना आदिलशाही कैदेतून सोडविण्यासाठी सुद्धा महाराज द्यायला तयार नव्हते. मोगलांबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांनी सिंहगडाच्या दरवाज्याची किल्ली स्वतः दिली आणि दस्तुरखुद्द औरंगजेबाने याचं नाव 'बक्षींदाबक्ष' म्हणजे 'देवाची देणगी' असं ठेवलं यावरूनच त्याचं सामरिक महत्त्व लक्षात येईल. सिंहगडाचं सामरिक महत्त्व कळण्यासाठी सिंहगड ज्या भुलेश्वर रांगेवर आहे ती भुलेश्वर रांग भौगोलिकदृष्ट्या समजायलाच हवी आणि नुसती समजायला हवी एवढंच नाही तर जैवविविधता, घाटवाटा, खिंडी, देवस्थाने, किल्ले, पाण्याच्या टाक्या, नद्यांची उगमस्थाने आणि ऐतिहासिक ठिकाणं यांची रेलचेल असलेली आपली भुलेश्वर रांग एक पुणेकर म्हणून तरी एकदा जोखायलाच हवी. बरोबर ना? तर मग मंडळी भुलेश्वर रांग जोखायला कधी करताय सुरूवात? 

🚩🚩

        माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही 

॥ मर्यादेयं विराजते ॥

🚩 'मावळ म्हणजे काय?' हे या दुव्यावर टिचकी मारून वाचता येईल.

🚩 फोटो - 

१) गुगल

२) महादेव पाटील

समाप्त.