सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

"जावळी"

"जावळी"


       छत्रपती शिवाजी महाराजांच्या "अफजलखान" प्रकरणाची सुरूवात "जावळी" जिंकून घेतल्यापासून होते. युद्धशास्त्रानुसार, SWOT (strength, weaknesses, opportunities & threats) आणि FMEA analysis (Failure Mode & Effects Analysis) केल्यानंतर आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. 

       आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडणे हे युध्द शास्त्रातील एक मोठे महत्त्वाचे तत्त्व आहे. महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कालसापेक्ष करणे हे जसे युध्दकलेतील एक तत्त्व आहे, त्याप्रमाणे शत्रूचा उत्साह कमी करणे, आपली तयारी वाढविणे, शत्रूला गोंधळात पाडून आपला कार्यभाग साधणे ही सुध्दा त्यापैकीच दुसरी तत्त्वे आहेत. म्हणूनच आपल्याला असं म्हणावं लागेल की अफजलखान प्रकरणात जावळीचा मोठा वाटा होता. या संपूर्ण प्रकरणात जावळी हा शब्द बऱ्याचदा उच्चारला जातो. त्यामुळे मोरेंची "जावळी" म्हणजे नेमकं काय आहे त्या विषयी घेतलेला हा मागोवा...

       छत्रपती शिवाजी महाराजांनी पौष वद्य चतुर्दशी, शके १५७७ म्हणजेच मंगळवार, १५ जानेवारी १६५६ रोजी चंद्रराव मोरे याचा पाडाव करून जावळी ताब्यात घेतली.(जे.श.) क्षेत्र महाबळेश्वरहून अत्यंत अवघड अशा निसणीच्या (निःश्रेणी) घाटाने उतरून स्वतः दोन हजार पदाती (पायदळ सैन्य) घेऊन त्यांनी ही अजोड कामगिरी केली आणि लगोलग घोणसपुरचा मकरंदगड, महाड जवळचा चांभारगड आणि ढवळ्या ऊर्फ चंद्रगड हे किल्ले स्वराज्यात सामील झाले. जावळीचं हे घनदाट जंगल काबीज झाल्यानंतर महाराजांचे लक्ष हे महाबळेश्वर समोरच्या भोरप्याच्या डोंगरावर गेलं. यालाच ७/१२ च्या उताऱ्यात 'रान आडवा गौड' असंही एक नाव आहे. तसंच नुकत्याच उपलब्ध झालेल्या 'प्रतापगडदुर्गामहात्म्य' या ग्रंथात त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो. जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी त्यावर किल्ला बांधण्याची मोरोपंतांना आज्ञा केली (शि.च.सा.ख.-१०-पृ-५४) आणि या गडाचं नामकरण केलं गेलं 'किल्ले प्रतापगड'.

       पण मग जावळीचा मुलूख म्हणजे आजचे कुठले तालुके किंवा गावं सांगता येतील? जर map वर pin point करायची झाली तर नेमकी ठिकाणं कुठली दाखवता येऊ शकतात? या विषयी ऐतिहासिक कागदपत्रात कुठे काही उल्लेख  सापडतात काय? याबाबतीत शोध घेतला असता कुर्डुगडाला पासलकर आणि मोरे यांच्यात लढाई झाली होती आणि कुर्डुगड हा ताम्हीणी घाटाजवळ आहे म्हणून ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाट दरम्यान जावळीचं खोरं येत असावं. सह्याद्रीची मुख्य रांग आणि त्यावर असलेल्या मावळाच्या लगतचा कोकणातील काही भाग मोरेंच्या अधिपत्याखाली येत होता. त्यामुळं जावळीची सीमा चिकटून असलेल्या मावळातल्या देशमुखात आणि मोरेंच्यात कायम कुरबुरी चालत असत. अफजलखान प्रकरणाच्या काही दिवसच आधी शिवाजी महाराजांकडे मोरें विरूद्धची पहिली तक्रार गुंजन मावळातल्या हैबतराव शिळीमकरांनी केली होती.

       याविषयी अजून काही भौगोलिक माहिती मिळती आहे काय याबद्दल शोध घेतल्यावर जावळी सुभा हा घाटावर आणि कोकणात असा दोन्ही भागात येतो अशी माहिती मिळाली. शाहू दप्तरात या सुभ्यांच्या याद्याच दिलेल्या आहेत. तसेच संक्राजी मल्हार याने स्वराज्याच्या सनदेमधे जावळी प्रांताच्या तर्फांची यादी दिलेली आहे. त्यावरून हा प्रांत सिद्ध केला आहे.
यात एकूण अठरा तर्फा आहेत. त्या अशा...

१) सुभा मंगळगड, तर्फा ५ - चांढवे, शिवथर, बीरवाडी, नाते, महाड. एकूण गावे २०७.

२) सुभा जावळी, तर्फा ७ - जोर, बारामुऱ्हे, कदंब, सोनाटसोळशे, आटेगाव, विन्हेरे, कोंढवी. एकूण गावे १९५.

३) सुभा व्याघ्रगड, तर्फा ५ - तांबी, बामणोली, हेळवाक, वनवली, मेसे(मेढे). एकूण गावे १५१.

४) सुभा महिपतगड, तर्फ १ - तेतले. एकूण गावे १८.

       म्हणजे या यादीनुसार लहान मोठी अशी सर्व मिळून तब्बल ५६४ गावं मोरेंच्या अधिपत्याखाली येत होती.

       याशिवाय मराठयांच्या इतिहासाची साधने खंड आठ मधे जावळीच्या १८ तर्फांची काहीशी वेगळी यादी दिली आहे पण यातली बरीच ठिकाणं आज सापडत नाहीत. मराठयांच्या इतिहासाची साधने या ग्रंथात दिलेली यादी पुढीलप्रमाणे...

१) बीरवाडी
२) सोमेश्वर
३) वार्से
४) खोरें
५) वळें
६) वेहेळें
७) कोंढवी
८) चांदेश्वर
९) बिजावली
१०) आठेगाव
११) माद्रणी
१२) माहुली
१३) होर्ते
१४) मेढेखोरे
१५) जोरखोरे
१६) साळवे
१७) बालेखोरे
१८) घरठाण 

 
       सुभा, तर्फ ही नावं जरा जड वाटतात ना? थोडं सोपं करून सांगतो...
       प्रांत म्हणजे सध्याच्या भाषेत राज्य म्हणजे जावळी प्रांत/ राज्य. सुभा म्हणजे जिल्हा. म्हणजे एकूण सुभे/ जिल्हे ४.  आणि तर्फ म्हणजे तालुका. ते झाले १८. तर्फ/तालूक्यात येणारी एकूण गावं ५६४. झालं कि नाही सोपं.

       म्हणजेच वर दिलेल्या गावांची नकाशावरील ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं परसलेलं होतं याची खात्री पटते.

       खरंतर शाहू दप्तरात या याद्या आल्या आहेत आणि त्यात शंका घ्यायला थोड्याफार नक्कीच जागा आहेत. पहिलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सुभ्यांचं मुख्यालय सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणी मोरेंचं वास्तव्य नक्कीच असायला हवं. थोडक्यात वर उल्लेखलेल्या सुभ्यांच्या ठिकाणावर मोरेंचे राहते वाडे किंवा कचेऱ्या असायलाच हव्यात. बरं त्याचं location, तेही संरक्षण दृष्टीनेही चपखल असायला हवं. शिवाय आजूबाजूला थोडीफार तरी शिबंदी मुक्काम करू शकेल अशी शिबंदीची घरटी किंवा क्वार्टर्स असायला हव्यात. सुभ्याच्या ठिकाणी दारूगोळा ठेवता येईल अशाही जागा असायला हव्यात आणि अगदी युद्धाच्या वेळी गरजच पडली तर बाजूच्या सुभ्यात असणारं मोरेंचं सैन्य चटकन मदतीला येऊ शकेल अशा ठिकाणी सुभा असायला हवा. थोडक्यात सुभ्याचं ठिकाण हे छोटा सैन्यतळ असलेलं प्रशासकीय कामकाज वगैरेच्या सर्व पॕरामीटर्समधे बसेल असं असायला हवं.
       उदाहरणादाखल असं सांगता येऊ शकेल की शिवथरघळीच्या वरच्या बाजूला असलेल्या चेराववाडीच्या हद्दीत मोरेंचा वाडा आहे. पडक्या अवस्थेत असलेला सदर वाडा आजही पाहता येतो. वर म्हटल्याप्रमाणे 'शिवथर' हे ठिकाण सुभ्यासाठी लागणाऱ्या सर्व पॕरामीटर्समधे चपखल बसतं पण शिवथर हा एक सुभा न सांगता एक तर्फ सांगितलेली आहे. अर्थात सुभा मंगळगडाचं शिवथर हे 'दुय्यम निबंधक कार्यालय' असण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही.

       शिवाजी राजांनी जावळी का घेतली याला देखील एक सबळ कारण नक्कीच आहे. मोरे जुमानेसा झाला होता हे एक कारण आहेच आणि जे सर्वांनाच माहिती आहे. त्याबाबत मोरे घराण्याची बखर काय सांगते ते पाहू. महाराजांनी चंद्ररावास पत्र लिहिले...

“तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां, राजे आम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन आपला मुलुक खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करुन फंद कराल, तर जावली मारुन तुम्हास कैद करुन ठेवू” 
उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले की, “तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावर कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जीवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोंकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबलेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितो आम्हा श्रीचे कृपेने पादशाहाने राजे किताब, मोरचले, सिंहासन मेहरेबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावलीचे करतो. तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर पष्ट समजून करणे आणखी वरकड मजकूर तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश घेता अपयशास पात्र होऊन जाल.”
चंद्रराव मोऱ्याचे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या महाराजांनी मोऱ्यांना अखेरचे पत्र लिहिले.
“जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करुन, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल”
म्हणून चंद्ररावाने महाराजांस आव्हानात्मक लिहिले. “दारूगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविते थोर समर्थ असो” (मो.घ.ब.)


       आणि म्हणूनच महाराजांनी जावळीवर स्वारी केली. पण केवळ या एवढयाच एका कारणामुळं महाराज पुर्ण जावळी प्रांत वा खोरं जिंकून घेतील असं वाटत नाही. सुरवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेत राज्याचं धोरण हे एकछत्री अंमलाखालचं नसून ते 'संघराज्य' असावं असंच होतं. महाराजांनी मावळातल्या कोणत्याच वतनदारांची वतनं खालसा केली नाहीत. पण जावळीच्याच बाबतीत अशी काय गोष्ट घडली की जावळी ताब्यात घ्यावी अशी निकड निर्माण झाली. तर त्याचं मुख्य कारण हे आहे की कोकणातील दाभोळ बंदरातुन जो माल विजापुरला जाई तो पारघाटाने वा हातलोट घाटाने जावळीमार्गे जात असे. त्यामुळे एकतर या मालावरची 'जकात' आता महाराजांना मिळणार होती आणि दुसरं असं कि विजापूरला 'आर्थिक दृष्टीने जखडून' टाकण्याचा तो एक डाव असावा. त्यामुळे बाहेरच्या देशांशी विजापुरचा जो व्यापार दाभोळ बंदरातून चाले त्यावर काही प्रमाणात 'नियंत्रण' आता महाराज ठेवू शकत होते.

       प्रत्येक सुभ्यात एक एक मोरे व्यवहार/ राज्य करीत असे (अफजलखान प्रकरणानंतर जावळीचे मोरे रायरीच्या मोर्यांच्या आश्रयास गेले होते). ते एकमेकांचे नातेवाईक असुनही त्यांच्यात भाऊबंदकी नक्कीच होती.
एकूणच काय तर महाराजांना जावळीची अभेद्य जागा ही विजापूरच्या आदिलशाहीची आर्थिक नाकेबंदी करून रणनीतीकदृष्ट्या जखडून ठेवण्यासाठी हवीच होती आणि त्यासाठी एक कारणही हवंच होतं, मग ते कोणतंही का असेना.

       किल्ले रायरी ते किल्ले खेळणा ऊर्फ विशाळगड? आणि कोयना काठ ते सांप्रतचा मुंबई - गोवा महामार्ग हा जावळीचा आद्य मुलुख आहे. त्या मुलखात...
१) शिवथर - यशवंतराव
२) जोर - हणमंतराव
३) जांभळी - गोविंदराव
४) महिपतगड - दौलतराव
५) केवनाळे व वाकण - बागराव
६) आटेगांव तर्फेतील देवळी - सूर्यराव
७) देवळी - भिकाजीराव
८) खेळणा - शंकरराव
हे आठ अनभिषिक्त मोरे घराण्यांतील आद्य राजे राज्य करीत होते.(मो.घ.ब.)

       सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत मोरे घराण्याने महाबळेश्वर, पर्वत, चकदेव, घोणसपूर, तळदेव, गाळदेव, धारदेव, मोळेश्वर, बाणकोट इत्यादी बारा? (की सात?) शिवपुऱ्या निर्माण केल्या. (मो.घ.ब.)

       जावळीप्रांतात जांभूळखोरे, जोरखोरे, शिवथरखोरे, कांदाटखोरे, ताजमहाल?, बामणोली, चतुर्बेट, सोलसखोरे, इ. १८ महाल होते. (मो.घ.ब.)

       जावळी मुलखातल्या घाटांबद्दल सांगायचं झालं तर पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या, अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इत्यादी लहान मोठे सुमारे ६० ते ६२ घाट होते. (मो.घ.ब.) ते पुढीलप्रमाणे (डोंगरयात्रा)

१) ताम्हीणी
२) सातपायरी/सातीपडी
३) सवत्या
४) निसणी/देव
५) लिंग्या
६) थिबथिबा
७) कुंभा
८) कावळ्या
९) बोचेघोळ
१०) निसणी
११) गायनाळ
१२) बोराटा नाळ
१३) सिंगापूर नाळ
१४) आग्यानाळ
१५) फडताड नाळ
१६) शेवत्या घाट
१७) मढेघाट
१८) उपांड्या
१९) आंबेनळी
२०) गोप्या
२१) सुपेनाळ
२२) भोवऱ्या
२३) खुटा
२४) पाळदार
२५) सुनेभाऊ/पारमाची
२६) वरंध
२७) वाघजाई
२८) कुंभनळी
२९) चिकणा
३०) चोरकणा
३१) अस्वलखिंड
३२) ढवळे
३३) सापळखिंड
३४) सावित्री
३५) दाभिळटोक
३६) रानकडसरी
३७) आंबेनळी
३८) केवनाळे
३९) पारघाट
४०) क्षेत्रपाळ
४१) कुडपण
४२) हातलोट
४३) कोंडनाळ
४४) अंगठेसरी
४५) नळी
४६) तेल्या
४७) मारखिंड
४८) कांदाट
४९) आंबिवली
५०) शिडीडाक
५१) रघुवीर
५२) भैरोबा
५३) नागसरी
५४) निवे
५५) तिवरे
५६) अंगठेसर
५७) कलावंतीणीची डाक
५८) मोरंगेची व्हळ
५९) सर
६०) शिडीची वाट
६१) डिचोली
६२) नांदिवसे
६३) दुर्गाची सरी
६४) पोफळी
       या व्यतिरिक्त नवीन सापडलेल्या लहानमोठ्या अशा बऱ्याच घाटवाटांची नावं इथं सांगता येतील, जी वरील यादीत नाहीत.

       किल्ल्यांविषयी सांगायचं तर रायगड, लिंगाणा, चंद्रगड, खेळणा, कांगोरी, कावळया, मकरंदगड, सोनगड, चांभारगड, महिपतगड, प्रतापगड (भोरप्या), रसाळगड, सुमारगड, जननीदुर्ग, वासोटा इ. किल्ले होते. (मो.घ.ब.)
       या व्यतिरिक्त डोंगरयात्रात असलेल्या आणि मी स्वतः फिरलेल्या या किल्ल्यांची नावं खाली दिलेली आहेत जी मोरे घराण्याच्या बखरीत नाहीत.

१) कुर्डुगड
२) मानगड
३) रायरी
४) लिंगाणा
५) कोंढवी
६) महिमंडणगड
७) जंगली जयगड
८) पन्हाळघर

       माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा थोडीफार कागदपत्रांची शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानानं इथं नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणीवा नक्कीच राहीलेल्या आहेत आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणीवांना वाचक मोठ्या मनानं क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे.

       सरतेशेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे । 
शोधोनी अचूक वेचावे ।। 
वेचोनी उपयोगावे । 
ज्ञान काही ।। 

।। लेखनसीमा ।। 

🚩 संदर्भ --
१) जेधे शकावली
२) शिवचरित्रसाहित्य खंड
३) शाहू दप्तर
४) मोरे घराण्याची बखर
५) डोंगरयात्रा
६) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड आठवा
७) Map Reference: Satara district gazetteer

नकाशात अफजलखानाचा वाईपासून प्रतापगडापर्यंतचा मार्ग दाखविलेला आहे.


1 टिप्पणी: